
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत
मतदारांनी लोकशाहीचा आदर करून सहकार जोपासला…
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडून आलेल्या निकालातून मतदारांनी लोकशाहीचा आदर करून सहकार जोपासत सहकारी संस्थांमध्ये राजकारण नको असा अप्रत्यक्षपणे ईशारा दिला आहे.
१८ वर्षाची बिनविरोध निवडणुकीची परंपरा असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रथमच बिनविरोध होवू शकली नाही. त्यामुळे या निवडणुकीत काळे-कोल्हेंनी पाहिल्यापासूनच अलिप्त राहत सुजान मतदारांच्या हाती सहकाराचे भवितव्य सोपविले होते. त्यामुळे काळे गटाकडून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम व जनसंपर्क कार्यालय प्रमुख संदीप लासुरे व कोल्हे गटाकडून कोल्हेंचे विश्वासू पराग संधान व जनसंपर्क अधिकारी रंगनाथ लोंढे यांच्या पातळीवरच या कृषी उत्पन्न बाजार समितीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. परंतु काळे-कोल्हे जरी या निवडणुकीत सक्रीय नसले तरी मतदारांनी लोकशाही जोपासून मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद देत या निवडणुकीत काळे कोल्हेंना दिलेला एकहाती कौल हा लोकशाही जोपासा परंतु सहकारात राजकारण नको असेच दर्शवित असल्याचे एकूण निकालावरून स्पष्ट होत आहे.
आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे मतमतांतर हे ठरलेले असतात. मात्र लोकशाही जपण्याबरोबरच सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधने देखील तेवढेच महत्वाचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काळे कोल्हे हे प्रमुख नेते सक्रीय नव्हते. मात्र या निवडणुकीत मतदारांनी सहकार जोपासण्याची परंपरा कायम ठेवली आहे. हा एक चांगला पायंडा पडला असून त्यामुळे यापुढील काळात देखील शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी सहकारी संस्थांमध्ये मतदारांना राजकारण नको असल्याचे या निवडणुकीच्या निकालातून सिद्ध होत आहे.
