
कोपरगांव प्रतिनिधी:-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात उपक्रमातून सामाजिक कार्याचे अदान-प्रदान होते. सबका साथ सबका विकास हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम तळागाळात यशस्वी होतांना दिसत असल्याचे प्रतिपादन प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
‘मन की बात’ या उपक्रमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या माध्यमातून १४० कोटी जनतेशी संवाद साधुन तळा- गाळातील वंचितांचे दुःख जाणून घेतात त्यांच्या शंभराव्या कार्यक्रमाचे सादरीकरण कोपरगाव विधानसभा मतदार संघात वाड्या-वस्त्या, आदिवासी पाडयावर झाले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रारंभी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात म्हणाले की, ३ ऑक्टोंबर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात उपक्रम सुरु केला. तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेती विषयक समस्या तंत्रज्ञानातून सोडविण्यावर केंद्र व राज्य शासनांतील मंत्री काम करत आहेत. भाजपा युवा मोर्चाचे तालूकाध्यक्ष विक्रम पाचोरे म्हणाले की, मन की बात युवकांच्या स्वप्नांना प्रेरणा देणारा उपक्रम आहे.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘यांनी जनतेशी संवाद साधत कल्पना जोडल्या आणि त्या प्रत्यक्षात साकारण्यांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाणिवपुर्वक प्रयत्न केले. जागतिक स्तरावर मन की बात चे कौतुक होणारा बहुदा हा उपक्रम एकमेव असावा. जागतिक महासत्तेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबर मन की बात संवादाची जगभर चर्चा झाली. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयातही शंभरावा मन की बातचा भाग ऐकला गेला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश असुन तळागाळातील जनतेनेच हा उपक्रम हाती घेऊन त्याची चर्चा करायला सुरुवात केली आहे. देशाच्या काना-कोपऱ्यात घडणाऱ्या वैशिष्टयपूर्ण घटना, सामाजिक काम अदान प्रदान करून त्याची दखल दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतात हेच या उपक्रमाचे फलित आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातही मन की बात प्रबोधनांतून सामाजिक एकतेचा संदेश सर्वदूर पोहोचणे हे अविस्मरणीय असल्याचे त्या शेवटी म्हणाल्या. महिला बचत गटाच्या भगिनींनी मन की बात उपक्रम पहिल्या भागापासून थेट शंभरावा भागापर्यंत प्रबोधन करण्यात आघाडी घेतली आहे. छोट्या छोट्या घटनांतून पंतप्रधान मोदी यांनी जनतेच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. स्टार्टअप हे त्याचे बोलके उदाहरण आहे. शहराध्यक्ष दत्ता काले व भाजपायुवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी आभार मानले.
