
कोपरगांव प्रतिनिधी:- गोदावरी कालवे रब्बी हंगाम पाटपाणी नियोजनासाठी नमुना नंबर ७ पाणी मागणी अर्ज ३० नोव्हेंबर पर्यंत भरून द्यावे असे जाहिर प्रकटन प्रसिध्द केले आहे त्यास २० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांची सध्या रब्बी हंगामासाठीच्या शेती मशागतीची कामे सुरू आहेत. त्यातच नाशिक पाटबंधारे विभागाने नमुना नंबर ७ वर पाणी मागणी अर्ज शेतक-यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत सादर करावे म्हणून प्रकटन प्रसिध्द केले आहे. ही अत्यल्प मुदत आहे. अजुन गोदावरी कालवे सल्लागार समितीची बैठक निश्चित झालेली नाही, गोदावरी कालव्यांना पाटपाण्यांचे किती आर्वतने देणार याबाबतचा कालबध्द कार्यक्रमही ठरलेला नाही, तसेच पुच्छ भागातील वितरीका, उपवितरीका याच्या दुरूस्तीची कामे बाकी आहेत. त्यामुळे रब्बीसह उन्हाळ हंगामाचे पीक नियोजन कसे करावयाचे याबाबत शेतक-यांमध्ये साशंकता आहे तेंव्हा पाटबंधारे खात्याने नमुना नंबर ७ पाणी अर्ज मागणीस तात्काळ मुदतवाढ द्यावी व कालवा सल्लागार समितीची बैठकही निश्चित करावी असेही सौ कोल्हे शेवटी म्हणाल्या.
