कोपरगाव शहरातील दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, भाजप व युवा मोर्चाची कोपरगाव शहर पोलिस प्रशासनाकडे मागणी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- पोलिस प्रशासनाच्या आदेशान्वये कोपरगाव शहरातील दुकाने रात्री १० वाजताच बंद केली जात असल्यामुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय, नागरिकांचीही गैरसोय होत आहे. हे टाळण्यासाठी शहरातील सर्व दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. याबाबत भाजपच्या प्रदेश सचिव, तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चाच्या वतीने कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांना निवेदन देण्यात आले.
हे निवेदन देताना अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, माधवराव आढाव सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजयराव आढाव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, माजी नगरसेवक बबलू वाणी, व्यापारी संघर्ष समितीचे अकबरभाई शेख, अन्सारभाई शेख, निसारभाई शेख, राजेंद्र बागुल, भाजप अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष खालिककभाई कुरेशी, गोपीनाथ गायकवाड, विनोद नाईकवाडे, किरण सुपेकर, वैभव गिरमे, विजय चव्हाणके, दीपक जपे, कचरुभाऊ लोहकणे, किसान सेलचे अध्यक्ष सतीश रानोडे, सचिन सावंत, शंकर बिऱ्हाडे, गोरख देवडे, इलियासभाई शेख, फकीर महंमद पहिलवान, सोमनाथ ताकवले आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.एच. दाते यांनी हे निवेदन स्वीकारले.
कोपरगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले एक मोठे शहर असून, तालुक्याचे ठिकाण आहे. ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी कोपरगावच्या बाजारपेठेत येत असतात. तसेच शासकीय आणि इतर कामासाठी कोपरगाव शहरात मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. ग्रामीण भागातील बरेच नागरिक जिल्ह्याच्या व इतर ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी जाऊन रात्री कोपरगाव येथे येतात आणि परत आपल्या गावी जात असतात. कोपरगाव शहरातील दुकाने रात्री १० वाजताच पोलिस यंत्रणा बंद करावयास लावते. त्यामुळे लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना तसेच पदपथावरील व्यावसायिकांना आपली दुकाने रात्री १० वाजताच बंद करावी लागतात. रात्री १० नंतर त्यांना व्यवसाय करता येत नाही. कोपरगाव शहरातील दुकाने रात्री १० नंतर बंद राहत असल्याने बाहेरगावाहून रात्री कोपरगावात येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. याचवेळी हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉलदेखील बंद असतात. त्यामुळे बाहेरगावाहून रात्री कोपरगावात येणाऱ्या नागरिकांना जेवण आणि खाद्यपदार्थही मिळत नाही. त्यामुळे त्यांना उपाशी राहावे लागते. तसेच घरगुती साहित्य विक्री करणारी दुकानेही रात्री १० वाजताच बंद केली जात असल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते.
कोरोना महामारीच्या काळात दोन-अडीच वर्षे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची दुकाने बंद होती. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर शासनाने निर्बंध शिथिल केल्याने आता कुठे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. व्यापाऱ्यांचा व्यवसाय होत आहे; परंतु पोलिस प्रशासन रात्री १० वाजेपर्यंतच कोपरगाव शहरातील दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देत असल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. व्यावसायिकांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी कोपरगाव शहरातील दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांचे हाल होणार नाहीत आणि शहरातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय सुरू राहून त्यांची उपजीविका चालेल. त्यासाठी कोपरगाव शहरातील दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी द्यावी व संबंधित यंत्रणेस तशा सूचना द्याव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *