‘बुध्दीवादी व विज्ञानवादी दृष्टीने विचार करण्याची आज गरज:- डॉ गोवर्धन हुसळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
“मानवाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या महापुरुषांना महामानव म्हटले जाते. महामानव हे नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करीत समाजाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले हे असेच महामानव होत. जन्मापासून अपमान, अवहेलना, यातना व प्रचंड संघर्ष करून भारतीय समाजातील वर्णव्यवस्थेची उतरंड तोडण्याचे पहिले धाडस या महामानवांनी केले. डॉ.आंबेडकरांनी केवळ दलितांसाठी नव्हे तर अखंड भारतातील समस्त जनतेच्या सर्व प्रकारच्या हितासाठी सर्वच क्षेत्रात अतुलनीय असे कार्य केले. त्यामुळेच बाबासाहेब खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते ठरतात,” असे प्रतिपादन ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ गोवर्धन हुसळे यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळ व राष्ट्रीय सण-उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने ‘बाबासाहेब आंबेडकर : जीवन व कर्तृत्व’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानसत्रात डॉ. हुसळे बोलत होते. अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे होते.
डॉ. हुसळे पुढे म्हणाले की “आज पुन्हा एकदा बुद्धिवादी आणि विज्ञानवादी दृष्टीने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रचंड ज्ञानसाधना, बुद्धिवादी व विज्ञानवादी दृष्टिकोन यामुळे बाबासाहेबांना पुढील आयुष्यात प्रचंड सन्मान प्राप्त झाला. त्यामुळेच शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन अशा महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालण्याऐवजी त्यांच्या विचारांचे हार आपल्या गळ्यात घालण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.”
अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा. संदीपराव रोहमारे म्हणाले की “बाबासाहेबांची जीवनकथा ही अंगावर शहारे आणणारी आहे. बाबासाहेबांनी देश व समाजासाठी अहोरात्र कार्य केले. आर.बी.आय. बँकेची संकल्पना देखील मुळात बाबासाहेबांचीच होय. वर्तमान भारतीय समाजाला बाबासाहेबांचे विचारच पुन्हा विकासाकडे नेतील. ” उपस्थितांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले की “ज्ञानसूर्य व प्रखर विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय समाजासाठी असलेले अतुलनीय योगदान लक्षात घेऊन आपण सर्वांनी पुढे गेले पाहिजे. जगातील सर्वश्रेष्ठ अशा राज्यघटनेचे निर्माण बाबासाहेबांनी केले, त्याचमुळे आज आपण सन्मानाचे व सुखाचे जीवन अनुभवत आहोत.” याप्रसंगी प्राचार्य डॉ. ठाणगे यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा उंचावत असलेला आलेख देखील मांडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमा पूजन करण्यात आले. वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. तसेच डॉ. आंबेडकर जयंती निमित्त आयोजित मराठी, हिंदी व इंग्रजी निबंध स्पर्धेच्या पारितोषिकांची घोषणा केली.
डॉ. रवींद्र जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले तसेच सुरेख सूत्रसंचालन केले. राष्ट्रीय सण-उत्सव समितीचे प्रमुख डॉ. बाबासाहेब गव्हाणे, प्रा. जावेद शहा, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, प्रा. संपत आहेर, प्रा.किरण सोळसे, श्री. रोहित लकारे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या व्याख्यानसत्रासाठी विविध विभागातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना डॉ.गोवर्धन हुसळे, मा. संदीपराव रोहमारे व प्राचार्य डॉ. विजय ठाणगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *