कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील काकडी, मल्हारवाडी व डांगेवाडी येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विमानतळ अधिकाऱ्यांनी या गावातील पाणी पुरवठ्याच्या पाण्याच्या टाक्यांचे काम तातडीने हाती घ्यावे अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात ना. आशुतोष काळे यांनी शुक्रवार (दि.१२) रोजी श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ काकडी येथे विमानतळाच्या आधिकऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करतांना त्यांनी प्रलंबित असलेल्या कामांची माहिती जाणून घेवून सुरु असलेल्या कामांची पाहणी करून सूचना केल्या. तसेच विमानतळावर जे कर्मचारी काम करीत आहेत त्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे.टॅक्सी चालकांच्या काही मागण्या व प्रश्न अनुत्तरीत असून त्याबाबत सकारात्मक भूमिका घेवून हे प्रश्न निकाली काढा. विमानतळ व परिसरातील गावांना विकास कामांच्या बाबतील दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशा सूचना त्यांनी यावेळी विमानतळ अधिकाऱ्यांना दिल्या. मागील पावसात विमान तळाच्या पडलेल्या संरक्षक भिंतीची तसेच एअर ट्राफिक कंट्रोल, नाईट लँडिंग सुविधा व काकडीकडे जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनच्या सुरू असलेल्या कामाची माहिती घेवून अग्निशमन यंत्रणेची पाहणी करून संपूर्ण विमान तळाच्या सर्वच प्रश्नांचा ना. आशुतोष काळे यांनी यावेळी घेतला.
यावेळी विमानतळ संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव, टर्मिनल इंचार्ज मुरली कृष्णा, अभियंता कौस्तुभ ससाणे, ऋषीकेश गुंजाळ, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रविण शिंदे, प्रभाकर गुंजाळ, श्रीरंग गुंजाळ, गोकुळ कांडेकर, बाबासाहेब गुंजाळ, शंकर दिघे, रावसाहेब कोल्हे, कानिफनाथ गव्हाणे, साहेबराव कांडेकर, संदीप गुंजाळ, युवराज गांगवे, ज्ञानेश्वर गव्हाणे, अशोक गव्हाणे, योगेश औताडे, अनिल गुंजाळ, मगेश नाईकवाडे, सोमनाथ रोठे, कैलास डांगे, सुभाष ढवळे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ:- श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना ना. आशुतोष काळे.
