
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेती मालाची मोठ्या प्रमणात आवक वाढून मोठ्या प्रमाणात उलाढाल वाढली आहे. बाजार समितीचे वार्षिक उत्पन देखील मोठ्या प्रमाणावर वाढले असले तरी या भरभराटी मागचे खरे सूत्रधार ना. आशुतोष काळे असून त्यांनी दिलेला तो मौलिक सल्ला बाजार समितीची भरभराट होण्यासाठी फलदायी ठरला असल्याचे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा यांनी म्हटले आहे.
बागरेचा यांनी पुढे म्हटले आहे की, कोपरगाव कृषी बाजार समिती अडचणीतून जात होती. बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न ७५ लाखावर आले होते. अशा बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असतांना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी २०१७ ला सर्व सर्वपक्षीय संचालक मंडळ, व्यापारी यांची संयुक्त बैठक घेवून अडचणी जाणून घेतल्या. त्यावेळी संचालक मंडळाला मार्गदर्शन करतांना त्यांनी गोणी पद्धत बंद करून सुट्या पद्धतीने कांदा, डाळिंब व भुसार मालाची खरेदी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेला प्रतिसाद देत सर्व पक्षीय संचालक मंडळाने कांदा, डाळिंब व भुसार मालाची सुट्या पद्धतीने खरेदी करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून बाजार समितीची आर्थिक उलाढाल वाढण्यास मोठी मदत झाली आहे.
सध्या नियमितपणे ५०० च्या वर वाहनातून शेती माल विक्रीसाठी बाजार समितीत येत आहे. येवला, राहाता, श्रीरामपूर या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे जावून कोपरगाव बाजार समितीने व्यवसाय केला आहे. त्यामुळे ७५ लाखावर आलेले वार्षिक उत्पन्न आज ३ कोटीच्या आसपास पोहोचले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची भरभराट होवून शेतकरी, व्यापारी व हमाल पंचायतला चांगले दिवस आले आहेत. हे फक्त आणि फक्त ना. आशुतोष काळे यांनी दिलेल्या त्या सल्ल्यामुळेच झाले असल्याचे धरमचंद बागरेचा यांनी म्हटले आहे.
