
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळ नगरी पर्यंत असलेल्या रस्त्याच्या कामाला ना. आशुतोष काळे यांनी दिलेल्या १ कोटी निधीतून नुकताच प्रारंभ झाला असून याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली होती. त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक लहान मुले महिला व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाहन चालकांना खड्डे चुकवतांना तारेवरची कसरत करावी लागत होती त्यामुळे रस्ते विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांनी शहराचा सर्वांगीण विकास करण्याबाबत नागरिकांना आश्वासित केले होते.त्या आश्वासनाची पूर्तता करतांना त्यांनी कोपरगाव शहर विकासासाठी व रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्या निधीतून कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.
बहुचर्चित असलेला श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळ नगरी या रस्त्याची देखील अत्यंत वाईट अवस्था झाली होती. या रस्त्यावर प्रसिद्ध हॉस्पिटल व बाजार समितीकडे जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ राहत असे. परंतु मागील काही वर्षापासून या रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडल्यामुळे प्रवास अवघड झाला होता. त्याचा शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी गटनेते नगरसेवक विरेन बोरावके, संदीप पगारे व नगरसेविका सौ. माधवी वाकचौरे यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळ नगरी या रस्त्यासाठी निधी द्या अशी मागणी या रस्त्याने नियमितपणे ये-जा करणाऱ्या शहरातील नागरिकांच्या समवेत ना. आशुतोष काळे यांच्याकडे केली होती.त्या मागणीची दखल घेऊन नामदार आशुतोष काळे यांनी या रस्त्यासाठी देखील १ कोटी निधी दिला आहे त्या निधीतून या रस्त्याचे काम सुरू झाले आहे त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.कोपरगाव शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांसाठी ना. आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्याबद्दल शहरातील नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरेसवकांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
