
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ५ गावांना ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रत्येकी २० लाख याप्रमाणे १ कोटी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
पंचायत राज्याचा पायाभूत घटक असलेल्या ग्रामपंचायतीला गावपातळीवर अनन्य साधारण महत्व आहे. उपलब्ध साधनसंपत्तीनुसार नागरिकांची गरज ओळखून त्या-त्या गावाचा विकास करण्याची जबाबदारी हि ग्रामपंचायतीवर असते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वसुविधांयुक्त ग्रामपंचायत कार्यालय असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र मतदार संघातील शिरसगाव, लौकी, शहापूर, चांदगव्हाण, सोनारी या गावांना ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत नव्हती. त्याबाबत महाविकास आघाडी सरकारकडे या गावांना ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु होत
त्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी वरील गावांना प्रत्येकी २० लाख याप्रमाणे १ कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून या गावांची ग्रामपंचायत कार्यालय इमारतीची मागणी पूर्ण झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची प्रत्यक्षपणे संपर्क साधणारी लोकशाही संस्था म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. प्रत्येक गावाच्या विकासाची जबाबदारी असलेली हि संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल घडवून आर्थिक विकास व सामाजिक न्याय प्रक्रियेत जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी महत्वाचे योगदान देत आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीला महत्व असून वरील गावाची मोठी अडचण महाविकास आघाडी सरकारने दूर केली आहे. त्याबद्दल ना.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहे.
