
कोपरगांव प्रतिनिधी:-
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी आपल्या कुटुंबापेक्षा समाज हेच आपले कुटुंब आहे असे मानुन त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यांसाठी आयुष्य खर्ची घातले आणि कोपरगांव – अहमदनगर जिल्हयासह राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
येसगाव येथील कोल्हे निवासस्थानी त्यांनी गुरुवारी भेट घेऊन सांत्वन केले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचा विकासाचा वसा त्यांच्या पुढील पिढीने बिपीनदादा, नितीनदादा, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे अमितदादा, जिल्हा सहकारी बँकेचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी समर्थपणे चालविला असून शिक्षणाच्या अमुलाग्र बदलासह सर्व सोयी सुविधा येथे निर्माण केल्या. जलसमृध्दीच्या कामात नगर – नाशिकसह मराठवाड्यातील प्रश्नांना शंकरराव कोल्हे यांनी न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला तो आम्हा राजकारण्यांना बोधप्रद आहे. त्यांचे उच्च व्यक्तीमत्व युवकांना प्रेरणादायी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना रुग्णांसाठी केलेली मदत जगात वाखाणण्याजोगी असुन शंकरराव कोल्हे व त्यांच्या कुटुंबीयांनी कोपरगाव मतदारसंघातील कोरोनाग्रस्तांना आधार देण्याचे काम केले ते निश्चितच उत्साहपूर्ण आहे असे त्या म्हणाल्या.
