
कोपरगांव प्रतिनिधी:-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे द्रष्टे युगपूरूष होते, त्यांनी अतिशय लहान वयात आई जिजाउ यांच्याकडुन संस्काराचे धडे घेत त्यातून स्वराज्याला घडविण्याची महान कामगिरी केली, शेती-शेतकरी आणि जलव्यवस्थापनावर त्यांनी प्रामुख्याने भर देत महाराष्ट्र राज्याची कृषि व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी असंख्य लोककल्याणकारी योजना राबविल्या असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ३९२ व्या शिवजयंतीनिमीत्त शिवप्रतिमेचे बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते पुजन करण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, तज्ञ संचालक विवेक कोल्हे, फकिरराव बोरनारे, प्रदिप नवले, सोपानराव पानगव्हाणे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, एच आर मॅनेजर प्रदिप गुरव, केन मॅनेजर गोरखनाथ शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, सचिव विधीज्ञ तुळशीराम कानवडे, मुख्य लेखापाल एस. एन. पवार, विधीज्ञ बाळासाहेब देशमुख यांच्यासह विविध खातेप्रमुख, उपखातेप्रमुख विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी संजीवनी सांस्कृतिक मंडळाचे प्रकाश डुंबरे व प्रविण टेमगर यांनी प्रास्तविक केले.
श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याच्या उत्कर्षासाठी गड तेथे आमराई आणि गांव तेथे वनराई हा नारा देत त्यातुन पर्यावरण संतुलन साधले. त्यांचा हा विचार किती दुरगामी होता याची कल्पना येते. रयतेवर त्यांचे अफाट प्रेम होते. प्रजेचे रक्षण करून महिला सुरक्षीततेला महत्व देत भक्कम नितीमुल्यावर लोकशाही उभारली. आचार, विचाराच्या जडणघडणीतुन महाराष्ट्र राज्याची किर्ती संपुर्ण जगात उमटवली, अष्टप्रधान मंडळामार्फत आपल्या कार्य कर्तृत्वाची छाप पाडली, युवकांना योग्य मार्गदर्शन करत त्यांच्या उत्कर्षासाठी सातत्याने नव नविन ध्येय धोरणे राबविली अशा द्रष्टया शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून त्यांच्या आठवणींना सतत उजाळा द्यावा असेही ते म्हणाले.
