
कोपरगांव प्रतिनीधी:-
संत भगवानबाबा विठठल भक्त होते, उसतोडणी कामगार, मजुर, तांडेकरी आदिंची त्यांच्यावर नितांत श्रध्दा असुन समता, बंधुता, मानवता आणि एकतेची शिकवण देणारे भगवानबाबा म्हणून त्यांची ख्याती आहे असे प्रतिपादन सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर भगवानबाबांची ५७ वी पुण्यतिथी साजरी करण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते. संचालक अरूणराव येवले, संजयराव होन, विश्वासराव महाले, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, डॉ. अजेय गर्जे, केन मॅनेजर गोरखनाथ शिंदे, सी. एन. वल्टे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी, शेतकी, उसविकास, केनयार्ड विभागाचे कर्मचारी, उसतोडणी मजुर, कंत्राटदार आदि उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. अजेय गर्जे म्हणाले की, भगवानबाबांनी मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कनार्टक, पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढत किर्तनातुन समाजातील अनिष्ठ अंधश्रध्दा, अज्ञान, रूढी परंपरा दूर करत जनजागृती केली. कौतीकाबाई व आबाजी सानप हे त्यांचे आईवडील होते. वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षीच भगवानबाबांनी घर सोडुन विठठल भक्तीत मन रमविले. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतीक मुल्यावर त्यांचा भर होता.
श्री.आप्पासाहेब दवंगे पुढे म्हणाले की, कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी उसतोडणी कामगारासाठी सर्व सुविधा देवुन, उस तोडणी वाहतुकदारांचा मृत्यु झाल्यास २ लाख रूपये, बैल मृत झाल्यास २५ हजार रूपये, अपघाती वैद्यकीय उपचारासाठी ३० हजार रूपये विमा अर्थसहाय मिळण्याबाबतची व्यवस्था करून ठेवली आहे असे ते म्हणाले. भगवानबाबा आणि उसतोडणी कामगार एक अतुट नाते असुन त्यांच्या समाजप्रबोधनावर हा वर्ग आपली प्रगती साधत आहे असे ते म्हणाले. शेवटी अरूणराव येवले यांनी आभार मानले.
