कोपरगाव शहराबरोबरच शेतकर्याला पाणी मिळाव म्हणून माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने प्रयत्न करत संघर्ष केला:- साहेबराव रोहोम…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहराचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांचे पाच नंबर साठवण तळ्याबाबतचे वक्तव्य हास्यास्पद असून एकीकडे शेतक-यांना पाणी मिळावे म्हणून पत्रकार परिषदा घेवुन आरडाओरडा करायचा व दुसरीकडे शहराच्या पाच नंबर साठवण तळ्याबाबत कोल्हे गट संभ्रम निर्माण करीत आहे अशी वक्तव्ये करायची त्यांची ही भूमिका दुटप्पी आणि सरड्याप्रमाणे रंग बदलणारी असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केले आहे.
त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि त्यांचे समर्थक शहरात ग्रामिण भागात, मतदारसंघात आणि जवळके पोहेगाव परिसरात गेले की सरड्याप्रमाणे रंग बदलुन सोयीची वक्तव्ये करतात हे सुज्ञ मतदारांनी अगोदर जाणून घ्यावं. जर निळवंडे धरणातून शहराला पाणी पुरवठा झाला तर ते पाणी शुद्ध असेल. अर्थात पर्यायाने दारणेतून शेतीसाठी अतिरिक्त एक रोटेशन मिळून तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो परिणामी बाजारपेठेसही उर्जितावस्था येईल, या गोष्टीकडे विरोधकांकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जातेय.
निळवंडेचे पाणी शहरात आल्यास पाणी शुद्धीकरण खर्च कमी असणार आहे, पाणी पट्टी कमी लागणार आहे, जनतेला भार देऊन पाच नंबर तलावसाठी जशी १२ कोटी रक्कम लोकवर्गणीतून भरावी लागणार आहे, तसे निळवंडे योजनेसाठी तत्कालीन भाजपा सरकारने २६ कोटी रुपये एवढी रक्कम नगरपरिषदेला माफ केली आहे.
पिण्याच्या पाणी योजनेबाबत कोणत्याही योजनेला विरोध असण्याचे काही कारण नाही, कोपरगाव नगरपालिका पिण्याच्या पाण्याची साठवण तळ्यiसाठी कोल्हे कुटूंबाच्या प्रयत्नांनीच जमिनी प्राप्त झाल्या आहेत हा इतिहास विरोधकांनी लक्षात ठेवावा.
कोपरगाव शहराबरोबरच शेतक-याला पाणी मिळावं म्हणुन माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने प्रयत्न करत संघर्ष केला. त्यानंतर तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शहरवासियांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटावी यासाठी निळवंडे शिर्डी कोपरगाव अशी संयुक्त पाणी पुरवठा योजना मंजुर केली, त्यातुन पाण्याचे आरक्षण मंजुर असताना ती कार्यान्वीत करावी म्हणून सातत्याने प्रयत्न केले मात्र विरोधकांनी त्यात अडथळे आणून झारीतले शुक्राचार्य होवुन निळवंडे-शिर्डी-कोपरगाव पिण्याच्या पाण्याची योजनाच बंद करून टाकली. तेव्हा पद्माकांत कुदळे यांच्या आडून खोटे आरोप करणाऱ्या आमदार काळेंनी अगोदर निळवंडे बाबतची भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतरच साठवण तलाव क्रमांक ५ बाबतची भूमिका मांडावी असेही साहेबराव रोहोम शेवटी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *