दहा वर्षाखालील मुलांना साईदर्शनाची परवानगी द्या:- अध्यक्ष आ.आशुतोष काळे…

कोपरगाव

शिर्डीकडे येणारी वाहतूक बाह्य मार्गाने वळवून, पोलीस कुमक वाढवा..!!

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):- साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र दहा वर्षाखालील मुलांना साईदर्शनाची परवानगी नसल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना अडचणी येत आहेत. त्यामुळे दहा वर्षाखालील मुलांना साईदर्शनाची परवानगी द्यावी अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. तसेच येणाऱ्या नाताळ सणाच्या सुट्टीमुळे व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांची गर्दी वाढणार आहे. साई भक्तांना त्रास होवू नये व त्यांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी शिर्डीकडे येणारी वाहतूक बाह्य मार्गाने वळवावी व अतिरिक्त पोलीस कुमक वाढवावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यशासनाने कोविड नियमांचे पालन करून घटस्थापनेपासून सर्व मंदिर व पार्थनास्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर देखील साईभक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मात्र दहा वर्षाखालील मुलांना मात्र दर्शनास परवानगी देण्यात आलेली नाही. दिवसेंदिवस शिर्डी येथे साईभक्तांची गर्दी वाढत आहे. मात्र येणाऱ्या साईभक्तांना आपले दहा वर्षाच्या आतील मुलांना दर्शनाची परवानगी नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. साईभक्तांना येणाऱ्या अडचणींची आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी. नागरिक योग्य काळजी घेत असल्यामुळे व आरोग्य विभाग प्रभावीपणे लसीकरण मोहीम राबवीत असल्यामुळे जिल्ह्यात व राज्यात कोविड संसर्ग नियंत्रणात आहे. शिर्डीतील साईमंदिरात देखील कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांना कोविड नियमांचे पालन करून साईदर्शनास परवानगी देण्यात आली आहे त्याप्रमाणे तेच नियम साईभक्तांच्या बरोबर येणाऱ्या दहा वर्षाखालील मुलांना देखील लावून त्यांना देखील साईदर्शनास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी आरोग्य मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

      तसेच दरवर्षी नाताळच्या सुट्टीत व नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी नाताळ सणापासून म्हणजेच २५ डिसेंबर ते १ जानेवारी या सप्ताहात शिर्डीमध्ये लाखो साईभक्त येत असतात हा आजवरचा इतिहास आहे. मागील काही दिवसापासून दिवसागणिक साईभक्तांच्या गर्दीत होणारी वाढ पाहता याहीवर्षी साईभक्तांची मोठी गर्दी होणार आहे. या साईभक्तांना सुलभ दर्शन मिळावे, भोजनालयात प्रसादरूपी दिले जाणारे जेवण व अन्य सुविधा देण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. परंतु साई मंदिर हे अहमदनगर-मनमाड महामार्गालगत आहे. या महामार्गावर सुरु असलेली वाहतूक व साईभक्तांची होणारी गर्दी यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होवून त्याचा त्रास साईभक्तांना होवून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यासाठी २५ डिसेंबर ते १ जानेवारी या सप्ताहात शिर्डीकडे येणारी वाहतूक बाह्य मार्गाने वळवावी. तसेच गर्दीचा फायदा घेवून अनुचित प्रकार घडू नये व साईभक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची जादा कुमक वाढवावी अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *