
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना एकल (विधवा) महिलांना पुनर्विवाह प्रोत्साहन अनुदान योजना लागू करावी असे देवळाली प्रवरा हेल्प टीम ने महिला व बाल कल्याण मंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
हेल्प टीमचे अध्यक्ष दत्ता कडू पाटील, व आप्पासाहेब ढुस यांची स्वाक्षरी असलेल्या निवेदनात पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असून समाज स्वास्थ्यासाठी अनेक सुधारणा व चळवळी राज्यात उभ्या राहून त्या देशासाठीही दिशादर्शक ठरल्या आहेत, या सुधारणा व चळवळीस महाराष्ट्र शासनाने सदैव मदत करत राज्यात सामाजिक परिवर्तन घडविण्यास हातभार लावला आहे. यामध्ये प्रामुख्याने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास आर्थिक तसेच सामाजिक पाठबळ देणेची योजना आपल्या राज्यात राबवणेत येते.
कोरोना महामारीमुळे राज्यात जवळपास ७० हजार महिला विधवा झाल्या आहेत. त्यात तरुण विधवांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या विधवांना शास्वत व कायम स्वरुपी पुनर्वसन त्यांचे पुनर्विवाहातून मिळणार आहे.
नुकताच अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा येथे हेल्प टीमचे सदस्य व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे पुतणे किशोर ढुस याने नऊ महिन्याचे बाळ असलेल्या वैशाली सोबत विवाह करून समाजा समोर आदर्श ठेवला आहे . त्यातून प्रेरणा घेत अनेक तरुण कोरोना विधवांसोबत पुनर्विवाह करणेस समोर येत आहेत, या चळवळीला गती मिळणेसाठी राज्य शासनाने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना देणेत येणारे प्रोत्साहन योजनेप्रमाणे कोरोना एकल (विधवा) महिलांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन देणारी योजना लागू करावी अशी विनंती निवेदनात केली आहे.
