
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ…
कोपरगाव प्रतिनीधी:-
राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे..
महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने राज्य शासनाकडे फी माफीसाठी वेळोवेळी अर्ज विनंत्या करून केलेल्या मागणीला अखेर यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया समितीचे राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब ढुस यांनी दिली.
कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक अथवा कायदेशीर पालक/ दत्तक पालक गमावलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊन पुढील वाटचाल खंडीत होण्याची शक्यता आहे. यास्तव महाराष्ट्र राज्यातील अशा बाधित विद्यार्थ्यांचे व्यापक हित विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2021-22 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावी या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या अशा नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने केली होती, ती मागणी आज राज्य शासनाणे मान्य केली व या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यास मान्यता देण्यात आली त्या बद्दल समितीचे वतीने आम्ही राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो असे आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले.
