विकासात राजकारण करण्याची कोल्हे गटाच्या नगरसेवकांची परंपरा :- विरेन बोरावके…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषदेमध्ये बहुमत असतांना व सर्व विकास समित्या देखील त्यांच्या ताब्यात असूनही विकासाच्या बाबतीत अनास्था असणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरेसवकांची विकासात राजकारणात करण्याची परंपरा जुनीच असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक गटनेते विरेन बोरावके यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात विरेन बोरावके यांनी पुढे असे म्हटले आहे की, स्थायी समितीच्या बैठकीत कोपरगाव शहराच्या विकासकामांच्या निविदा कोल्हे गटाच्या नगरेसवकांनी नामंजूर केल्या यामध्ये विशेष काही नाही. सर्व समित्या त्यांच्या ताब्यात, समितीचे सभापती देखील त्यांचेच तरीसुद्धा या समित्यांच्या बैठका वेळेवर न घेणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरेसवकांकडून दुसऱ्या अपेक्षा काय करणार? त्यांनी आजपर्यंत विकासकामांना आडवे येवून वेळोवेळी विकासकामात पद्धतशीरपणे राजकारण आणून हि विकास कामे हाणून पाडायची एवढेच काम आजवर त्यांनी केले आहे याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळे त्यांनी विकासकामांच्या निविदा नामंजूर केल्या यात गैर काहींही नाही कदाचित त्यांना त्यांच्या नेतृत्वाकडूनच अशा सूचना असतील त्यात त्यांचा काय दोष अशी खोचक टीका केली आहे.
कोपरगाव शहराच्या नागरिकांना नियमितपणे पाणी पूरवठा व्हावा यासाठी आमचे नेते आमदार आशुतोष काळे काय करीत आहे हे कोपरगाव शहरातील जनता जाणून आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी संपले असता नागरिकांची अडचण होवू नये यासाठी साठवण तलाव भरण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आवर्तन सोडण्यास सांगितले. याचा विसर विरोधकांना पडला असेल मात्र शहरातील नागरिक विसरले नाहीत. कोटीच्या कोटी वल्गना करून व विकासाचे फ्लेक्स बोर्ड लावून कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पदरात कोणता विकास घातला असा प्रश्न विचारला आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी जेवढी विकासकामे ठेवण्यात आली होती त्यामध्ये बहुतांश कामे ही कोल्हे गटाच्या नगरसेवकांच्याच प्रभागातील होती व सदर कामाचे ठेकेदार हेदेखील त्यांच्याच विचारांचे असतांना कोपरगाव शहराचा विकास होऊ द्यायचाच नाही हा एकच विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या विकासकामांच्या निविदा नामंजूर केल्या हे कोपरगाव शहरातील जनतेचे दुर्दैव असून आपले पितळ उघडे पडणार या भीतीपोटी त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे विरेन बोरावके यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *