
कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव विधानसभा मतदार संघातील सुमारे ४ हजार लाभार्थ्यांचे जुलै ते ऑक्टोंबर या चार महिन्याच्या काळातील संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांचे अनुदान थकले आहे एकीकडे कोरोना महामारी तर दुसरीकडे दिवाळसण तोंडावर आल्याने या निराधार लाभार्थ्यावर उपासमारीची वेळ आली आहे तेव्हा हे थकीत अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, मतदार संघातील निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी भूमिहिन वृध्द, घटस्फोटीत, परित्यक्त्या, दिव्यांग आदि लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान मिळत असते, पण जुलै पासुन लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होत नसल्याने संबंधीत पात्र व्यक्ती बँकेत हेलपाटे मारून थकुन गेले असुन हे अनुदान मिळावे म्हणून आपल्याकडे मागणी केली आहे. त्यावर तहसिलदार विजय बोरूडे यांच्याकडे चौकशी केली असता अनुदानाची रक्कम जिल्हाधिका-यांकडे मागणी केली असुन ती अद्यापही प्राप्त झालेली नाही ती प्राप्त होताच लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल असे ते म्हणाले. या पात्र लाभार्थ्यांवर प्रथमच दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ येवुन ठेपली आहे. तर वयोवृध्दावर जगायचे कसे हा प्रश्न पडला आहे. तेंव्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रश्नांत लक्ष घालुन या अनुदानाची रक्कम तात्काळ देण्यांबाबत कार्यवाही करावी व या लाभार्थ्यांना दिलासा देवुन दिवाळी गोड करावी असेही सौ. कोल्हे शेवटी म्हणाल्या.
