
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर –उन्हाळी हंगाम २०२६ साठी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी २७ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शेतकरी या मुदतीत अर्ज भरू शकले नव्हते. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून उभ्या पिकांना, फळबागांना आणि चारा पिकांना पाण्याची नितांत गरज भासणार आहे. जर या शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्ज भरता आले नसते तर ते उन्हाळी सिंचन आवर्तनापासून वंचित राहिले असते आणि त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते. ही अडचण ओळखून आमदार आशुतोष काळे यांनी राहिलेल्या शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी पाटबंधारे विभागाला मुदतवाढ देण्याबाबत सूचना केल्या होत्या.
त्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने सात नंबर अर्ज भरण्यासाठी २० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज भरले नाही. त्या शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपले पाणी मागणी अर्ज दिलेल्या मुदतीच्या आत पाटबंधारे विभागाच्या संबंधित कार्यालयाकडे जमा करावेत असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पाणी मागणी अर्ज भरणे बाकी होते त्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून त्या शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
