कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील श्री. अरुण भास्कर भिंगारे यांच्या चिरंजीव स्व. कल्पेश अरुण भिंगारे यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पद्धतीने साजरे करण्यात आले. या निमित्ताने एकलव्य आदिवासी आश्रम शाळा टाकळी येथे विद्यार्थ्यांना भोजनदान तसेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ब्लँकेटचे वाटप करून स्मृतिदिन अर्थपूर्ण करण्यात आला.
स्व. कल्पेश भिंगारे यांचे सुमारे साडेपाच महिन्यांपूर्वी आकस्मिक निधन झाले होते. पंचक्रोशीतील गावांमध्ये मित्रपरिवारात मनमिळावू, होतकरू आणि मदतीस तत्पर असा त्यांचा स्वभाव सर्वपरिचित होता. एकुलत्या एक मुलाच्या निधनाने भिंगारे कुटुंबावर मोठा आघात झाला असला, तरी त्याची स्वप्ने आणि मूल्ये जपण्याचा निर्धार करत कुटुंबीय व मित्रपरिवाराने या दुःखातून सकारात्मक वाट निवडत पुण्यस्मरणाचा हा सामाजिक उपक्रम राबविला.
या कार्यक्रमाला संजीवनी शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त सुमित नितीनराव कोल्हे, संजीवनी स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा , करंजी व टाकळी येथील ग्रामस्थ, टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच संदीपजी देवकर, करंजीचे सरपंच रवीभाऊ आगवन तसेच भिंगारे परिवारातील स्नेही, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेच्या वतीने कल्पेश यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
श्रद्धांजलीपर भाषणात रेणुका ताई कोल्हे यांनी भिंगारे परिवारावर आलेले दुःख अत्यंत मोठे असल्याची भावना व्यक्त करत, दुःखातून सावरण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करून समाजोपयोगी कार्यातून स्मृती जपण्याचा परिवाराचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगितले. अशा उदात्त हेतूने केलेल्या कार्यामुळे दिवंगत आत्म्यास निश्चितच सद्गती लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सुमित कोल्हे यांनीही भिंगारे परिवाराच्या सुखदुःखात कोल्हे परिवार सदैव सहभागी असल्याचे सांगत, गरजू आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या मुलाचा आनंद शोधण्याचा परिवाराचा विचार प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.
एकूणच, सामाजिक संवेदना, सेवाभाव आणि स्मृतींचा सन्मान यांचे सुंदर संगम ठरलेला हा उपक्रम उपस्थितांच्या मनात भावनिक ठसा उमटवून गेला. स्व. कल्पेश भिंगारे यांच्या स्मृती जपताना समाजोपयोगी कार्यातून प्रेरणा देणारे हे पुण्यस्मरण परिसरासाठी आदर्श ठरले.

फोटो : संजीवनी एकलव्य आदिवासी आश्रमशाळेतील मुलांसमवेत श्री व सौ अरुण भिंगारे, सुमित कोल्हे (विश्वस्त संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी), सौ,रेणुका विवेक कोल्हे (अध्यक्ष संजीवनी स्वयं सहाय्यता बचत गट) ,मुख्याध्यापक टकले सर ,मुख्याध्यापिका श्रीमती जोशी, सरपंच संदीप देवकर टाकळी ग्रामपंचायत, रवीभाऊ आगवन सरपंच करंजी.
