उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे पद धोक्यातबनावट जात प्रमाणपत्राद्वारे मिळविले पद…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्राच्या मदतीने पद मिळविले असून त्यांचे पद रद्द व्हावे याबाबत अहिल्यानगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अपील दाखल केले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सागर आहेर यांच्या वतीने गौतम बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अॅडव्होकेट मुन्ना सय्यद यांनी दिली आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या राजकारणात खळबळ उडाली असून उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे पद धोक्यात आले आहे.
याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सागर आहेर यांच्या वतीने सविस्तर माहिती देतांना अॅडव्होकेट मुन्ना सय्यद यांनी देतांना सांगितले की, पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ हा प्रभाग एस.सी.प्रवर्गासाठी राखीव होता. त्यामुळे या प्रभागातून निवडणूक लढवणारा उमेदवार हा एस.सी. प्रवर्गातील असणे आवश्यक होते. परंतु या प्रभागातून आपले नाम निर्देशनपत्र भरतांना विद्यमान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी आपल्या नाम निर्देशनपत्रात आपल्या जातीचा केलेला उल्लेखच चुकीचा आहे.

वडिलांची जात मुलाच्या दाखल्यावर असते त्यामुळे वडिलांची जात वेगळी आणि मुलाची जात वेगळी असे असु शकत नाही. मात्र जितेंद्र रणशूर यांच्या वडिलांच्या दाखल्यावर वेगळी जात आणि जितेंद्र रणशूर यांच्या दाखल्यावर वेगळी जात असल्याचे मिळालेल्या कागदपत्रातून समोर आले आहे. त्यामुळे जितेंद्र रणशूर यांनी आपल्या नाम निर्देशनपत्रात आपल्या जातीबाबत खोटी माहिती दिली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ हा प्रभाग एस.सी.प्रवर्गासाठी राखीव असतांना जितेंद्र रणशूर यांनी चुकीची माहिती देवून फसवणूक केली असून त्यांची झालेली निवड हि पूर्णत: बेकायदेशीर आहे.

त्याबाबत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अहिल्यानगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अपील दाखल केले असून लवकरच न्यायालयातही अपील दाखल करणार आहे. यापूर्वी अशा प्रकरणात वेळकाढूपणा करून कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असली तरी यावेळी मात्र असे होणार नाही याची काळजी घेवून चुकीचे काम करणाऱ्यांना कोणताही वेळ मिळू देणार नाही. वेळप्रसंगी आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा न्यायालयात जावून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे योग्य वेळेत आणि शक्य तितक्या लवकर याचा निकाल लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोल्हे गटाच्या काही नगरसेवकांनी देखील अशाच प्रकारे खोटी माहिती देवून पद मिळविले आहे. त्यांचेबाबत कागद पत्र उपलब्ध झाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे अॅडव्होकेट मुन्ना सय्यद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यामुळे कोपरगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून जितेंद्र रणशूर यांच्या उपनगराध्यक्षपदावर टांगती तलवार या प्रकरणामुळे निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *