
कोपरगाव प्रतिनिधी:- वस्तुत: आजच्या गतिमान जीवनात आपले साधे शेजारच्याशी सुध्दा बोलणे होत नाही की आपण होऊन कोणाशी बोलायचे टाळत असतो, ज्यामागे प्रत्येकातलाच एक अहमपणा असतो. परंतु तोच कधीकधी आपल्या अंगलट येतो. याउलट हे उदा. पहा, एका बर्फाच्या मोठ्या कारखान्यातल्या सिक्यूरिटी गार्डंला होणारा साधा नमस्कार, हा कारखाना बंद झाल्यानंतर नकळत आतमध्ये अडकलेल्या कामगाराचा जीव वाचवतो, यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. पण ते खरे आहे, सगळे कारखान्याच्या बाहेर पडल्यानंतर कारखाना बंद करताना फक्त त्या सिक्यूरिटीच्या लक्षात येते की आतमध्ये कुणीतरी राहिले आहे. सर्व आश्चर्यचकीत होऊन विचारतात हे तुला कसे कळले, तेव्हा सिक्यूरिटी सांगतो की साहेब, रोज नमस्कार घालणारी ही व्यक्ती आज नजरेस आली नसल्यामुळे. पहा प्रसंग साधा, नमस्कार साधा परंतु संबधित कर्मचार्याचा जीव मात्र बहुमोलाचा, जो केवळ या गार्डंमुळे वाचला. तेव्हा कोणाला कमी न लेखता, आजुबाजूंच्याशी किमान बोलणे, चालणे, नमस्कार वगैरे ठेवा. प्रसंगी उंदीरसुध्दा सिंहाच्या कामी आल्याची गोष्टसुध्दा सर्वश्रुत आहेच.
