आ.आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून एन.एच.१६०च्या वंचित प्रकल्पबाधितांना मिळणार मोबदला..!

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या एन.एच. १६० मुळे शासकीय जागेवर वास्तव्यास असलेले अनेक बाधित नागरिक मोबदल्यापासून पासून वंचित होते. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रातांधिकारी गोविंद शिंदे, एन.एच.१६०चे प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंके यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीचे लवकरात लवकर मुल्यांकन होवून या प्रकल्पबाधित नागरिकांना मोबदला मिळणार आहे.
कोपरगाव तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग १६० जात असून या महामार्गामुळे प्रकल्पबाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना व तसेच अनेक नागरिकांना त्यांच्या जमिनीचा व होणाऱ्या नुकसानीचा योग्य मोबदला देण्यात आला आहे. मात्र जे नागरिक शासकीय जागेवर वास्तव्यास होते, ज्यांचे त्या जागेवर उद्योग व्यवसाय सुरु होते त्या जागा सबंधित नागरिकांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना शासनाकडून भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामध्ये देर्डे कोऱ्हाळे येथील ४२ व चांदेकसारे येथील ७ नागरिकांचा समावेश होता. त्याबाबत या नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे भरपाई मिळावी यासाठी त्यांना साकडे घातले होते. हे नागरिक जरी शासकीय जागेवर राहत असले तरी एन.एच.१६० मुळे या नागरिकांचे हक्काचे घर व व्यवसाय हिरावले जाऊन या नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार करून आमदार आशुतोष काळे यांनी त्याबाबत जिल्हाधिकारी, प्रांतधिकारी, प्रकल्पाधिकारी यांच्यासोबत अनेक बैठका घेवून हा प्रश्न लावून धरला होता. त्याबाबत शासनाने एक पाऊल मागे घेत आ. आशुतोष काळे यांच्यासमवेत नुकतीच बैठक घेवून शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या ज्या नागरिकांचे घर, व्यवसाय बाधित झाले आहेत. त्या नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेवून त्याचे मुल्यांकन करण्यात येईल व त्याप्रमाणात या नागरिकांना भरपाई देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी गोविद शिंदे यांनी शासनाच्या वतीने आ.आशुतोष काळे यांना सांगितले आहे. त्यामुळे शासकीय जागेवर राहत असलेले जे नागरिक भरपाई पासून अद्यापही वंचित होते त्या नागरिकांना भरपाई मिळणार असल्यामुळे या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून या नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. या बैठकी दरम्यान आ.आशुतोष काळे यांनी एन.एच.१६०चे प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंके यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून वंचित असलेल्या प्रक्ल्पाबाधितांना लवकरात लवकर जास्तीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. यावेळी प्रातांधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, सार्वजनिक बांधकाम अभियंता प्रशांत वाकचौरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, संचालक सचिन रोहमारे, देर्डेचे सरपंच योगीराज देशमुख,सुधाकर होन, कृष्णा शिलेदार, केशव विघे आदि उपस्थित होते.

फोटो ओळ – एन.एच.१६० मुळे शासकीय जागेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मोबदला मिळावा यासाठी आयोजित बैठकीत प्रातांधिकारी गोविंद शिंदे यांच्यासोबत चर्चा करतांना आ. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *