रोटरी क्लब व संजीवनी फाऊंडेशन च्या वतीने रोजगाराभिुख साहित्याचे वाटप…
कोपरगांव प्रतिनिधी:- माणवावर संकटे येतात, जातात, संकटांमुळे खचुन न जाता त्यावर मात करणे खरे पुरूषार्थ आहे. खडतर परीस्थितीकडे सकारात्मक नजरेतुन पाहीले, तर हीच परीस्थिती संघर्ष करण्यास शिकविते, आणि संघर्षातून जीवन समृध्द करता येते, असे प्रतिपादन कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले यांनी केले.
रोटरी क्लब कोपरगांव सेंट्रल यांच्या वतीने कोरोना काळात संकटात सापडलेल्या महिलांसाठी शिलाई मशिन व संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांगासाठी सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी सायकलचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री देसले बोलत होते. सदर प्रसंगी रोटरीचे अध्यक्ष श्री रोहीत वाघ, कोपरगांव रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर श्री भैरवप्रसाद केशरवाणी, सचिव श्री विरेश अग्रवाल, जयहिंद सायकल मार्टचे मालक श्री सनी अव्हाड, रेल्वेचे श्री अमित दुबे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे तसेच रोटरी क्लबचे विशाल आढाव, स्वप्नील गवारे, श्री राकेश काले, श्री अमर नरोडे, श्री प्रकाश जाधव, कुनाल आभाळे, श्री अभिजीत रक्ताटे,अनुप पटेल, रिंकेश नरोडे आदी उपस्थित होते.
सदर प्रसंगी कोपरगाव मधिल शकिला इम्राण सय्यद, सुरेखा पुंजाराम दवंगे, ज्याती लालु वायकर, सुवर्णा गणेश वैद्य,रीना सागर मोरे व अलका शिवाजी दाणे यांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले तर नाटेगांव येथिल अनिल गंगाधर भालेराव व संवत्सर येथिल अनंत चांगदेव निकम या दिव्यांगांना सौर उर्जेवर चालणाऱ्या तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सर्वच गरजुंना रोजी रोटीचे साधनं मिळाल्याने सर्वच क्षणभर काहीसे भावुक झाले होते.
श्री देसले पुढे म्हणाले की आमच्या प्रशिक्षण काळात गुजरात मधिल कच्छ ला तेथिल भुकंप ग्रस्तांच्या मदतीसाठी आम्हाला पाठविण्यात आले होते. संकटात कोणाची काय हाल होते हे आम्ही बघितले. परंतु संकटातुनही जे सावरतात, ते जीवनात कधीच हार मानत नाही. गरजुंना देण्यात आलेल्या सायकली अथवा शिलाई मशिनद्वारे त्यांनी स्थिर स्थावर होवुन इतरांचे प्रेरणास्थान बनावे, असे श्री देसले शेवटी म्हणाले.
रोटरीचे अध्यक्ष श्री वाघ यांनी रोटरीच्या कामाचा आढावा मांडला व रोटरी मार्फत विविध विधायक कामांची माहिती दिली. सचिव श्री विरेश अग्रवाल यांनी सांगीतले की जिध्द आणि चिकाटी असेल तर यशस्वी होण्यास काहीच अडचण येत नाही. उदाहरण देताना म्हणाले की मुंबईच्या श्रीमती अनिता डोंगरे यांनी दोन शिलाई मशिनच्या सहायाने ‘अँड ’ ब्रँड काढुन रू ८०० कोटीची उलाढाल पुर्ण केली. तसेच श्री अग्रवाल यांनी जिल्हा रोटरी क्लबचे पदाधिकारी हरिष मोटवाणी, डाॅ. ओमप्रकाश मोतीपावळे, प्रमोद पारख, दिलीप मालपाणी यांचे प्रती शिलाई मशिनला अर्थसहाय्य दिल्या बध्दल धन्यवाद दिले.
सुत्रसंचलन श्री रावसाहेब शेंडगे यांनी केले तर श्री राकेश काले यांनी आभार मानले.

फोटो ओळीः- रोटरी क्लब व संजीवनी फाऊंडेशन,यांचे वतीने गरजु महिलांना शिलाई मशिन व दिव्यांगांना सौर उर्जेवर चालणाऱ्या सायकलींचे वाटप करण्यात आले
