गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी आजपर्यंत ५५ कोटी मंजूर:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- गोदावरी कालव्यांची वहन क्षमता कमी झाल्यामुळे सिंचनासाठी शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळत नव्हते. पर्यायाने शेतीच्या उत्पन्नावर दुष्परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत होते.गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून कालवे दुरुस्तीच्या कामासाठी निधी मिळावा याबाबत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यापासून सातत्याने जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता त्या पाठपुराव्यातून यापूर्वीच ४० कोटी रुपये मंजूर झाले असून आज पुन्हा जलसंपदा विभागाकडून गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून असे आजपर्यंत एकूण ५५ कोटी रुपये गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
गोदावरी कालव्यांची दुरुस्ती हा मतदार संघातील ऐरणीचा विषय होता. गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यावर हजारो हेक्टर शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी गोदावरीच्या डाव्या-उजव्या कालव्यांना निधी मिळावा यासाठी जलसंपदा मंत्र्यांची वेळोवेळी भेट घेवून त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे देखील कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याबाबत आग्रही मागणी केली होती. त्यामुळे गोदावरी कालव्यांच्या दूरूस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्या माध्यमातून मागील तीन महिन्याच्या कालावाधीत ४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पुन्हा नव्याने १५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढे देखील गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.गोदावरी कालव्याला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार,जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील यांचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *