
कोपरगाव प्रतिनिधी:-
“शरीर निरोगी राहण्यासाठी जशी व्यायामाची व समतोल आहाराची गरज असते, त्याचप्रमाणे मन निरोगी राहण्यासाठी वाचनाची नितांत गरज असते. तरुण वयात विद्यार्थीदशेत पासून तर अगदी वृद्धावस्थेपर्यंत वाचन केलेच पाहिजे. विशेषत: शालेय जीवनात प्रवेश केल्यानंतर आपण वाचनास सुरुवात करतो. ही सवय उच्च शिक्षण घेत असतानाही सुरू ठेवली पाहिजे; तरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व-विकासाची संकल्पना प्रत्यक्षात उतरली असे म्हणता येईल.” असे प्रतिपादन ग्रंथपाल प्रा.निता शिंदे यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ऑनलाईन ‘वाचन-दिना’ च्या प्रमुख वक्ता म्हणून प्रा. शिंदे बोलत होत्या.
केरळमधील ग्रंथालय चळवळीचे जनक कै.पी. एन. पाणीक्कर यांच्या स्मरणार्थ देशभरात ‘वाचन-दिन’ साजरा केला जातो. यानिमित्ताने ऑनलाईन वेबिनार व ग्रंथ परीक्षण स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.

प्रा. शिंदे पुढे म्हणाले की, वाचनाने माणसाचे आंतरिक व्यक्तिमत्व विकसित होते. देशाच्या इतिहासातील व एकूणच जागतिक कीर्तीचे अनेक वैज्ञानिक, महापुरुष, लेखक, समाज सुधारक हे आदी मुळेच घडले असल्याचेही त्या म्हणाल्या. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दिवसाला १८ ते २१ तास वाचन करीत असत. ग्रंथावर त्यांचे अतूट प्रेम होते. ग्रंथासाठी घर बांधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील एकमेव व्यक्ती आहेत. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी जगतात ग्रंथापेक्षा मोबाईल व संगणकाचे प्रस्थ वाढले आहे. तरीही या माध्यमातूनही विद्यार्थी आपल्या वाचनाची भूक शमवू शकतात, कारण आज मोबाईलवर सर्व वर्तमानपत्रे, मासिके, पाक्षिकांसोबतच अनेक मौल्यवान ग्रंथसंपदाही उपलब्ध असल्याचे ही प्रा. शिंदे म्हणाल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बी. एस. यादव यांनी उपस्थितांचे स्वागत करुन महाविद्यालयातील विविध विभागातील नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विशेष वक्ता म्हणून बोलताना महाविद्यालयाच्या IQAC विभागाचे प्रमुख प्रा. विजय ठाणगे म्हणाले की, “ग्रंथालय हा महाविद्यालयाचा आत्मा असून तेथील ग्रंथांचे विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन केले पाहिजे. ग्रंथाशिवाय येथे दीड डझन वृत्तपत्रे व १०० पेक्षा अधिक साप्ताहिके, पाक्षिके व मासिके ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच शेकडो प्रेरणादायी कथा कादंबऱ्या ही आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. ई -रिसोर्स देखील मुबलक आहेत.” विद्यार्थ्यांना त्याचेही वाचन करण्याचे आव्हान प्रा. ठाणगे यांनी केलेले. वाचन-दिना निमित्त संपन्न झालेले ग्रंथ परीक्षण स्पर्धेत यशस्वी व सहभागी सर्व स्पर्धकांचे प्रा. ठाणगे यांनी अभिनंदन केले.
या ऑनलाईन कार्यक्रमास जवळपास १०० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागाचे श्री.बाळासाहेब पानगव्हाणे, श्री. स्वप्निल आंबरे, श्री.रवींद्र रोहमारे व श्री.अविनाश शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
