महिनोंमहिने मागणी करूनही विदयुत रोहित्र दिले जात नसल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना विचारला जाब. माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांचा वीज मंडळाच्या कार्यालयात ठिया..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना महामारीच्या काळात मोठया आर्थीक संकटाला शेतकरी बांधव सामोरे जात असतांना वीज वितरण कंपनी या बांधवांना आणखी आर्थीक खाईत लोटण्याचे काम करत आहे. बीले भरूनही विदयुत रोहित्र दिले जात नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी अधिका-यांना जाब विचारत तातडीने रोहित्र बसवून देण्याची मागणी केली.
वीज वितरण कंपनीच्या कोपरगाव येथील महाराप्ट्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाउन सौ कोल्हे यांनी उपस्थित सहायक अभियंता दिनेश चावडा यांना मतदार संघातील विदयुत रोहित्रा अभावी होत असलेल्या नुकसानासंदर्भात धारेवर धरले. यावेळी विविध गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते. सौ कोल्हे पुढे म्हणाल्या की, सध्या वीजेचा खेळखंडोबा सुरू अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या भावनेशी खेळ सुरू आहे. कोरोना सारख्या महामारीच्या संकटात अनेक कुटूंबांना आर्थीक फटका बसला आहे. सध्या पावसाने ओढ दिली असुन विहीरीच्या पाण्यावर जनावरांच्या चा-यांसह इतर पिकांची लागवड केली आहे. आर्थीक परिस्थिती नसतांनाही पिके उभी केली, परंतु वीज वितरण कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे हाती आलेली पिके वाया जात आहे. त्याचप्रमाणे वारंवार वीजबिले भरण्याची मागणी करून मनस्ताप देण्याचे काम केले जात आहे. वीज वितरण कंपनीच्या मागणीप्रमाणे वीजबीले भरूनही विदयुत रोहित्र बसविण्यास टाळटाळ केली जात असून महिनोंमहिने विदयुत रोहित्र देण्यात टाळाटाळ करून अधिकारी विदयुत रोहित्र वाटपात दुजाभाव करीत असल्याचा आरोपही सौ कोल्हे यांनी यावेळी केला.
ब्राम्हणगाव येथील वाकचैरे डी.पी. गेल्या एक महिन्यापासून जळालेली आहे. वारंवार मागणी करूनही दुरूस्ती केली जात नाही, यामुळे महिनाभरापासून येथील नागरीकांसह जनावरेही पाण्यापासून वंचित आहे. अनेक कुटूंबांच्या घरातील लाईटही बंद असल्याने शेतकरी बांधवामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या परिस्थितीमध्ये वीज मंडळ त्यांना दुजाभावाची वागणुक देउन त्यांच्या भावनांशी खेळत आहे. ही अन्यायकारक भुमिका आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. विदयुत रोहित्र तातडीने दुरूस्त करून शेतक-यांना न्याय दयावा,अन्यथा वीज वितरण मंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सौ कोल्हे यांनी दिला.
राज्याचे उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांचेसह वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता श्री सांगळे, कार्यकारी अभियंता श्री मुळे यांचेशी संपर्क साधून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विदयुत पुरवठा तातडीने सुरळीत करून नादुरूस्त विदयुत रोहित्र तातडीने बसवून देण्याची मागणीही सौ कोल्हे यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *