
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपरिषद कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ७ मधील छत्रपती श्री शिवाजीनगर येथे असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत होते. परिसरातील नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही या उद्यानाकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नव्हते. मा. आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे व युवानेते विवेकभैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक प्रसाद आढाव व नगरसेविका सौ. सोनल अजमेरे यांच्या पुढाकाराने या उद्यानाच्या स्वच्छतेचा उपक्रम हाती घेण्यात आला.
दिनांक १८ फेब्रुवारी रोजी उद्यानाची सर्वांगीण स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर दिनांक १९ फेब्रुवारी रोजी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्यान परिसरात अभिवादन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक वर्षांनी स्वच्छ व नीटनेटके झालेले उद्यान पाहून शिवाजीनगर परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, डॉ. अमोल अजमेरे, नगरसेवक प्रसाद आढाव, नगरसेविका सोनल अजमेरे तसेच परिसरातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी उद्यानाच्या पुढील विकासाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांना आश्वासन दिले की सदर उद्यानाचे सुशोभीकरण व विकास लवकरच करण्यात येणार असून ते सर्वांसाठी नियमितपणे खुले करण्यात येईल. नगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान रेणुकाताई कोल्हे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून हे पहिले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून भविष्यातही अशा विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
चौकट
उद्यानाची स्वच्छता करून नागरिकांसाठी ते खुले केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष,नगरसेवक व पालिकेचे या कामाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.
