मंदिर परिसरांच्‍या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):– पुरातन मंदिरे ही हिंदू धर्म आणि संस्‍कृतीची प्रतिके आहेत. विकासाची प्रक्रिया राबविताना आध्‍यात्मिक वारसा जोपासणे हे आपले कर्तव्‍य असून मंदिर परिसरांच्‍या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी‌ ग्वाही जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.
राहाता शहराचे आराध्‍यदैवत श्री वीरभद्र महाराज मंदिराला ‘क’ वर्ग देवस्‍थानाचा दर्जा प्राप्‍त करुन दिल्‍याबद्दल पालकमंत्री श्री.विखे पाटील यांचा विश्‍वस्‍त मंडळाच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आला. तसेच वीरभद्र महादेव मंदिराच्‍या जीर्णोद्धार कार्यक्रमाच्‍या कोनशिलेचे अनावरण करण्‍यात आले. याप्रसंगी माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, मुकुंदराव सदाफळ, देवस्‍थान ट्रस्‍टचे अध्‍यक्ष साहेबराव निधाणे, अॅड.रघुनाथ बोठे, उपाध्‍यक्ष सचिन बोठे, माजी नगराध्‍यक्ष कैलास सदाफळ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्‍हणाले की, जिल्‍ह्यातील तीर्थक्षेत्र पर्यटनाला पाठबळ देण्‍याचे काम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विकासाची प्रक्रिया पुढे घेवून जाताना पारंपरिक मंदिरांचा वारसाही जोपासणे आपले कर्तव्‍य आहे.
शिर्डी आणि राहाता परिसरातील आध्यात्मिक पर्यटनाच्‍यादृष्‍टीने शिर्डी येथे थीम पार्कचे काम लवकरच सुरू होणार आहे. तालुक्‍यातील गोदावरी कालव्‍यांचे नूतनीकरण व शिर्डी औद्योगिक वसाहतीतून युवकांच्‍या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्‍प असल्‍याचे श्री.विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, साहेबराव निधाणे यांनीही मनोगत व्‍यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *