सोमैया महाविद्यालयात महिला उद्योजकता विषयावर व्याख्यान संपन्न….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
“विद्यार्थिनींनी आता दुसऱ्याकडे रोजगार किंवा नोकरी मागण्यापेक्षा स्वतःच उद्योजक होऊन दुसऱ्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करावा. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास हे सहज शक्य आहे. मी स्वतः हा अनुभव घेते आहे. मीही आधी प्राध्यापिका होते, परंतु आता या क्षणी मी एक उद्योजक आहे आणि अनेकांना मी रोजगार उपलब्ध करून देत आहे.” असे प्रतिपादन श्रीमती मनिषा बारबिंड यांनी केले. स्थानिक के जे सोमैया वरिष्ठ व के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि महिला सबलीकरण कक्षाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले की “मुलींनी आता आई वडिलांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनले पाहिजे. सद्यस्थितीमध्ये मुलींनी केवळ नोकरीपुरते सीमित न राहता उद्योग-व्यवसायाकडे वळले पाहिजे. महिलांना आता सगळीकडे अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ घेऊन विद्यार्थिनींनी करिअर करावे.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला सबलीकरण कक्षाच्या प्रमुख ग्रंथपाल डॉ नीता शिंदे यांनी प्रास्ताविक व अतिथी परिचय करून देताना महिला सबलीकरण कक्षाचा उद्देश कथन करून विद्यार्थिनींनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून करिअर करावे असे आवाहन केले.
महिला सबलीकरण कक्षाच्या सदस्य सुरेखा भिंगारदिवे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले तर प्रा. कोमल अडसरे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *