लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात:- आ.आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – महायुती शासनाने राज्यातील माता-भगिनींसाठी आणलेली ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेचे पैसे माता भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून कोपरगाव मतदार संघातील जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ होणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
महिला भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती शासनाने राज्यातील माता-भगिनींसाठी ‘माझी लाडकी बहीण’ योजना आणली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत कोपरगाव मतदार संघातील पात्र लाभार्थी माता-भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोपरगाव शहरासह मतदार संघातील प्रत्येक गावात सहाय्यता केंद्र सुरू केले होते. त्या माध्यमातून हजारो महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केले आहेत.
या योजनेच्या सुरुवातीला ज्या कागदपत्रांची आवश्यकता होती ते कागदपत्र मिळण्यास होत असलेला विलंब व माता-भगिनींना येत असलेल्या अडचणींची दखल घेऊन महायुती शासनाने बहुतांश कागदपत्रांची अट रद्द करून जास्तीत जास्त माता-भगिनींना या योजनेचा लाभ कसा घेता येईल त्यासाठी इतरही अटी शिथिल केल्या होत्या.त्यामुळे माता भगिनींना आपला अर्ज दाखल करतांना येणाऱ्या अडचणी कमी झाल्या होत्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार हे नुकतेच कोपरगाव मतदार संघात जन सन्मान यात्रा घेऊन आले होते. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ६००० कोटीच्या फाईलवर सही करून आलो असल्याचे सांगत १७ ऑगस्ट रोजी ज्या माता भगिनींनी ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेचे अर्ज भरले आहेत त्या माता-भगिनींच्या खात्यावर जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा होणार असल्याचे सांगितले होते. त्या शब्दाची पूर्तता दोन दिवस अगोदरच झाली असून अनेक माता-भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. ही माता-भगिनींसाठी अतिशय सुखावह व समाधानकारक बाब आहे. परंतु अनेक माता भगिनिंच्या बँक खात्याला व आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक अर्थात जोडलेला नाही अशा माता भगिनींच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात अडचणी येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे माता भगिनींनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याला व आधार कार्डला लिंक करून घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
अर्ज ऑनलाईन भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.ज्या पात्र माता भगिनींनी आपले अर्ज भरले आहेत अशा सर्वच माता भागिनिंच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असून या योजनेचा कोपरगाव मतदार संघातील जास्तीत जास्त महिलांना लाभ होईल असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *