साक्षर समाजाच्या निर्मितीत महात्मा फुलेंचे अमुल्य योगदान:-आ. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- एका स्त्रीचं शिक्षण म्हणजे अवघ्या कुटुंबाचं शिक्षण आणि स्त्रिया सुशिक्षित असतील तरच समाजाची आणि देशाची प्रगती होऊ शकते अशी महात्मा ज्योतिबा फुले यांची विचारसरणी होती. त्या विचारसरणीवर आयुष्यभर वाटचाल करतांना देशात पहिली मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे वाड्यात सुरू करुन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. समाजसुधारक, विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ, स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक आणि क्रांतिकारी कार्यकर्ते म्हणून महात्मा फुले यांचे नाव आजही अत्यंत आदराने घेतले जात असून साक्षर समाजाच्या निर्मितीत महात्मा ज्योतिबा फुले याचं अमुल्य योगदान असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव शहरातील माळी बोर्डिंग येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी समर्पित करून शेतकरी आणि मजुरांच्या हक्कांसाठीही काम केले. यासोबतच मुलींना शिक्षण देण्यासाठी मुलींसाठी शाळा सुरू करून स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुले केली. समाज सुधारणेसाठी बालविवाह थांबवणे आणि विधवांचे पुनर्विवाह अशी महत्वपूर्ण कामे केली. महात्मा फुलेंनी समाज सुधारणेसाठी महत्त्वाचं कार्य केलं आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजातील रंजल्या-गांजल्या घटकांसाठी अखंडपणे कार्यरत राहून त्यांना जगण्याचे बळ आणि दिशा दिली. महात्मा फुले यांचे अनमोल विचार समाजाला प्रेरणा देणारे आणि क्रांती निर्माण करणारे असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

फोटो ओळ – माळी बोर्डिंग येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अभिवादन करतांना आ.आशुतोष काळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *