पालखेड डाव्या कालव्यातून पूर्व भागातील गाव तलाव, पाझर तलाव व बंधारे भरून द्या आ. आशुतोष काळेंची मागणी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – चालू वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे संपूर्ण कोपरगाव मतदार संघात दुष्काळी परिस्थिती आहे. नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पूर्व भागातील नागरिक टँकर सुरु करावे असा आग्रह करीत आहे. त्यामुळे पूर्व भागातील गाव तलाव, पाझर तलाव व बंधारे भरून द्यावेत अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दिलेल्या पत्रात आ.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मौजे नाटेगांव, आंचलगांव, ओगदी, पढेगांव, कासली, दहेगांव बोलका, शिरसगांव-सावळगांव, तिळवणी, आपेगांव, उक्कडगांव, तळेगांव मळे या भागात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे परिणामी भूगर्भाची पाणी पातळी खालावली जावून विहिरींचा पाणीसाठा कमी झालेला आहे. त्यामुळे या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. सदरच्या गावांमध्ये प्रत्येकी २००० ते ३००० च्या आसपास लोकसंख्या असून पशुधन देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने पिण्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता असून त्यामुळे नागरिकांनी तातडीने टँकर सुरु करण्याची मागणी केलेली आहे.
सध्या पालखेड धरणातून पालखेड डावा तट कालव्याद्वारे दिंडोरी, निफाड, येवला तालुक्यातील गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आलेले आहे. कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे पालखेड डाव्या कालव्यातून सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून सदरच्या गावातील गाव तलाव, पाझर तलाव व बंधारे भरले गेल्यास नागरिकांचा व जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास निश्चितपणे मदत होणार आहे व शासनाचा टँकर सुरु करण्यासाठी होणारा आर्थिक खर्च देखील वाचणार आहे.त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून कोपरगाव मतदार संघातील मौजे नाटेगांव, आंचलगांव, ओगदी, पढेगांव, कासली, दहेगांव बोलका, शिरसगांव-सावळगांव, तिळवणी, आपेगांव, उक्कडगांव, तळेगांव मळे या गावातील गाव तलाव, पाझर तलाव व बंधारे भरून देण्यासाठी पालखेड डावा तट कालव्याद्वारे आवर्तन सोडण्याकरिता संबंधित विभागास तातडीने सूचना कराव्या अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या पत्रात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *