कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- ग्रामीण भागातील जीवन आणि शहरी भागातील जीवन यामध्ये फार मोठे अंतर असल्यामुळे मागील तीन दशकापूर्वी ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण घेणे दुरापास्त होते. गुणवत्ता असून देखील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहत होत्या.या मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी माई आज्जी अर्थात स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्या अट्टाहासातून उभ्या राहिलेल्या महाविद्यालयात ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षण पूर्ण करून आज उच्च पदावर कार्यरत असण्यामागे शिस्तप्रिय माई आज्जीचे योगदान असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ऑनलाईन ‘राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे’ उदघाटन प्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, घर, कुटंब, सामाजिक जबाबदारी सांभाळून कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी स्थापन केलेल्या एकमेव असलेल्या गौतम एज्युकेशन सोसायटीच्या भरभराटीत माई आज्जीचे मोठे पाठबळ मिळाले आहे. ग्रामीण भागातील मुलींनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे, एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये हे त्यांनी पाहिलेलं स्वप्न कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी पूर्ण केले. शिक्षण घेवून किती मोठी पदवी मिळविली यापेक्षा त्या शिक्षणाचा समाजाला व आपल्या कुटुंबाला किती फायदा होतो हे महत्वाचे आहे असे माई आज्जीचे विचार होते. या विचारांवर विद्यार्थ्यांनी वाटचाल करून आपल्या शिक्षणाचा समाजाच्या जडणघडनीत हातभार लावावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.
यावेळी आर्टस् व कॉमर्स महाविद्यालय बेलापूरचे प्रा. बाबासाहेब पवार, प्राचार्या डॉ.सौ. विजया गुरसळ, सहभागी स्पर्धक, सर्व प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ – स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ऑनलाईन ‘राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे’ उदघाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आ. आशुतोष काळे.
