तळागाळातील संघर्षशील योद्धा हरपला:- बिपिनदादा कोल्हे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री व पाथर्डीचे लोकनेते बबनराव दादाबा ढाकणे यांच्या निधनाने तळागाळातील संघर्ष योद्धा हरपला अशा शब्दात संजीवनी उद्योग समूहाच्याचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी श्रद्धांजली वाहिली. भाजपाच्या सौ. स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनीही शोक व्यक्त केला.
श्री. बिपिनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, माजी केंद्रीय राज्यमंत्री स्वर्गीय बबनराव ढाकणे हे हाडाचे शेतकरी होते. त्यांनी अत्यंत लहान वयात समाजकारणासह राजकारणाचे धडे घेत सक्रिय समाजसेवेत सहभाग घेतला. देशाचे पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांची त्यांनी विद्यार्थी दशेत भेट घेत पाथर्डीकरांच्या समस्या सांगितल्या.
समाजवादी नेते ना. ग. गोरे, सेनापती बापट, एस एम जोशी आदींबरोबर त्यांनी काम केले. गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी भाग घेतला होता. वसतीगृहात राहून त्यांनी स्वतःला घडवले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण विकास मंत्री म्हणूनही त्यांनी मोठे काम केले. स्थानिक स्वराज्य संस्था ते थेट संसदीय मंडळ असा त्यांचा प्रवास राहिल.
शेती आणि शेतकरी, कष्टकरी मजूर, ऊस तोडणी कामगार आदी घटकांच्या समस्या काय असतात, ग्रामीण भागात कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते याबाबत नेमकी वस्तुस्थिती त्यांनी विधिमंडळात पत्रके भिरकाऊन मांडली होती. माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व राजकीय नेतृत्व एकत्रित काम करताना जिल्ह्याच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत असत. स्व. शंकरराव कोल्हे आणि बबनराव ढाकणे यांनी विधिमंडळात काम करताना शेती आणि शेतकरी हाच एकमेव विचार विधिमंडळ पटलावर मांडून त्यांना न्याय देण्यासाठी सतत वेगवेगळ्या भूमिका मांडल्या त्यासाठी संघर्ष केला. जिरायत भागातील प्रश्न काय असतात याची वस्तुस्थिती मांडून त्याच्या सोडवणूकीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. स्वर्गीय बबनराव ढाकणे यांच्या निधनामुळे आपण एका संघर्षशील लोकनेत्याला मुकलो आहोत, त्यांच्या नेतृत्वाची उणीव भरून निघणे अवघड आहे असेही बिपिनदादा कोल्हे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *