कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- निळवंडे कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. कोपरगाव मतदार संघातील जिरायती भागातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद या तेरा गावात आणण्यासाठी येणाऱ्या अडचणी आ. आशुतोष काळे यांनी दूर केल्या असून पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव भरून घेण्यासाठी बुजविण्यात आलेले ओढे आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्याने उकरण्यास प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती रांजणगाव देशमुखच्या सरपंच सौ. जिजाबाई मते यांनी दिली आहे.
आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेवरून निळवंडे कालव्यांना पाणी सोडण्यात येवून पाणी पुरवठा योजनांचे सर्वच साठवण तलाव भरून घेतले जाणार आहे परंतु वितरिकांची कामे पूर्ण होण्यास काही अवधी असल्यामुळे साठवण तलावात चर, ओढ्याच्या माध्यमातून पाणी आणावे लागणार आहे. संगमनेर तालुक्यातील वडझिरे परीसरातील शेतकऱ्यांनी चर बुजविले असल्यामुळे निळवंडे कालव्याचे पाणी कोपरगाव मतदार संघातील गावात आणण्यासाठी अडचणी येत असून त्याबाबत आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून संगमनेर तहसील कार्यालय, भूमि-अभिलेख कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे सरपंच सौ. जिजाबाई मते यांनी सांगितले आहे. आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील तहसील व भूमि-अभिलेख कार्यालयाला सूचना देवून चर उकरण्यात येणाऱ्या अडचणी दूर केल्या. चर, ओढे नाले खोदून हे पाणी साठवण तलावात साठविले जावून दुष्काळी तेरा गावातील भूजलपातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे त्यासाठी बुजविलेले चर, ओढे उकरणे गरजेचे होते.
त्याबाबत या तेरा गावातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांच्याकडे बुजविण्यात आलेले चर, ओढे, नाले उकरण्याची मागणी केली केली होती. त्या मागणीची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या सर्वोतोपरी सहकार्यामुळे चर,ओढे, नाले, उकरण्यास प्रारंभ करण्यात येवून चर्चा करून सिमेंट पाईप देखील उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद, या जिरायती गावातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. याप्रसंगी काळे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ- निळवंडे कालव्याचे पाणी जिरायती भागात आणून पाणी पुरवठा साठवण तलाव भरण्यासाठी चर, ओढे, नाले उकरण्यास प्रारंभ करण्यात आला.
