के. जे. सोमैया महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात भारताच्या स्वातंत्र लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे, प्रो. विजय ठाणगे, डॉ.गणेश देशमुख, प्रो.बी.बी.भोसले, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, श्री.संजय पाचोरे यांच्या हस्ते दोन्ही महापुरूषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या दोन्ही राष्ट्रपुरूषांचे व्यक्तिमत्व निश्चितच सर्वासाठी प्रेरणादायी ठरले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते होते. दक्षिण आफ्रिकेतील भारतीय समुदायाच्या नागरी हक्कांसाठी त्यांनी तेथे प्रवासी वकील म्हणून काम केले आणि भारतीय नागरिकांना मदत केली. त्यांनी प्रत्येक परिस्थितीत अहिंसा आणि सत्याचे पालन केले आणि लोकांना त्यांचे अनुकरण करण्यास सांगितले. महात्मा गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली. जे काम कोणत्याही शस्त्राने करता येत नाही ते काम कायदा, नैतिक मूल्ये आणि नैतिकतेने होऊ शकते असे त्यांनी नेहमी सगळ्यांना सांगितले. गांधीजींचे स्वदेशी आंदोलन हे राष्ट्रप्रेमाचे लक्षण आहे. लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या छोट्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी करून एक वेगळाच ठसा उमटविला आहे. ‘जय जवान, जय किसान’ हा नारा देऊन त्यांनी जवान आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला आहे. यावरून लालबहादूर शास्त्री यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येऊ शकतो. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *