
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील वाकडी गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी आवश्यक असलेल्या शेती महामंडळाच्या जमिनीचे मूल्यांकन भरण्याची ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे या जमिनीचे मूल्यांकन माफ करावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेल्या पत्रात केली आहे
दिलेल्या पत्रात आ.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राहाता तालुक्यातील वाकडी येथील पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी आवश्यक असलेली स्वतःच्या मालकीची जागा वाकडी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे काम रखडलेले आहे. वाकडी ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे साठवण तलावाकरीता महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची गट नंबर २१६ मधील ४ हेक्टर ८८ आर जागा मिळणे बाबत प्रस्ताव दाखल केलेला आहे. ही जागा वाकडी ग्रामपंचायतीला साठवण तलावाला देण्यासाठी शेती महामंडळाने तयारी दर्शविली असून या क्षेत्राची शेती महामंडळाने चालू बाजारभाव प्रमाणे येणाऱ्या मूल्यांकनाची शेती महामंडळाने मागणी केलेली आहे.
त्या अनुषंगाने या क्षेत्राचे बाजार मूल्य दर तक्त्यानुसार वाकडी गाव हे प्रभावक्षेत्रात असून बाजार मूल्य तक्त्यानुसार गट नंबर २१६/२ क्षेत्र ४ हेक्टर ८८ आर विभाग क्रमांक ११.१ सूचना क्रमांक १६ अ नुसार मूल्यांकन १ कोटी ८७ लाख ३८ हजार रुपये एवढे निश्चित होत आहे. परंतु वाकडी ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती एवढी मोठी नसल्यामुळे वाकडी ग्रामपंचायत जमीन मूल्यांकनाप्रमाणे एवढी मोठी रक्कम भरू शकत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अडकून पडला आहे. मागील अनेक वर्षापासून वाकडी गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. परंतु हा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर असतांना साठवण तलावासाठी आवश्यक असणारी जागा वाकडी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्यामुळे हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अडला आहे. पर्यायी जागेची व्यवस्था केली असली तरी सदरच्या या जमिनीचे मूल्यांकन वाकडी ग्रामपंचायत भरू शकत नाही.त्यामुळे सदरच्या जागेचे मूल्यांकन माफ करून वाकडी गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.
