
कोपरगाव प्रतिनिधी:-
‘नारी अबला होती. शिक्षण विचाराने ती आता सबला झाली असून पाळण्याची दोरी सांभाळण्या बरोबरच कुटुंबा सोबतच आता जगाचे नेतृत्व करत आहे. हि महिलांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. त्यातूनच सुसंस्कृत विचार हे नेतृत्वातून जगाला देत प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतांना दिसते’ असे प्रतिपादन राज योगिनी ब्रम्हकुमारी सरला दीदी यांनी ९ मार्च २०२१ रोजी जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्री निमित्त निवारा वासियांसाठी वीरशैव महिला मंडळ आणि श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानपर कार्यक्रमात केले.
तसेच त्या म्हणाल्या कि, ‘प्रत्येक व्यक्तीच्या विचारांवर सुख, दु:ख अवलंबुन असतात. प्रत्येक नात्यात सुख असले पाहिजे, अहंकार नसला पाहिजे. विचारांतूनच उर्जा बनते आणि ती उर्जा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातून दिसून येते. हे सर्व शिवाच्या शक्तीपासून तयार होते. शिवाची शक्ती म्हणजे आत्मा होय. आत्म्यापासूनच विचार तयार होत असतात. सर्व विचार हे व्यक्तीच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून असते.’
प्रसंगी वीरशैव महिला मंडळाच्या संस्थापिका सौ.सुहासिनी कोयटे, समता इंटरनॅशनल स्कूलच्या मनेजिंग ट्रस्टी सौ. स्वाती कोयटे, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार तसेच निवारा, परिसरातील महिला, वीरशैव महिला मंडळ, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
व्याख्यानपर कार्यक्रमाची सुरुवात राजयोगीनी ब्रम्हकुमारी सरला दीदी, वीरशैव महिला मंडळाच्या संस्थापिका सौ.सुहासिनी कोयटे, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सोनार,समता इंटरनॅशनल स्कूलच्या मनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख व्याख्यातांचा परिचय आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरशैव महिला मंडळ अध्यक्षा सौ. दिपाली नलगे यांनी केले. तर संस्थापिका सौ.सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते व्याख्यात्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. स्वाती कोयटे यांनीही महिला सशक्तीकरण या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वीरशैव महिला मंडळाच्या सौ.प्रिती साखरे, सौ.अर्चना नीलकंठ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.विष्णुपंत गायकवाड,सौ.नंदिनी कदम तसेच वीरशैव महिला मंडळ आणि श्रेष्ठ नागरिक मित्रमंडळाच्या महिलांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांचे आभार वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. दिपाली नलगे यांनी मानले.
