

कोपरगाव प्रतिनिधी:- वारकरी पोशाख,डोक्यावर तुळस, भगवी पताका उंच फडकवत टाळाच्या नादात फुगडीचा ठेका धरत विठ्ठल नामाचा गजर करत जिल्हा परिषद भास्कर वस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांनी भास्कर वस्ती परिसरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घडवून आषाढी वारी साजरी केली. या वारीतून चिमुकल्यांनी समतेचा, पर्यावरणाचा आणि पाणी आडवा पाणी जिरवा हा संदेश दिला. पंढरपूरचे प्रसिद्ध विठ्ठल मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. लाखो वारकरी विठ्ठल माऊलीला भेटण्यासाठी आणि दर्शनासाठी पंढरपूरला पायी जातात. त्या वारीचा अनुभव शाळेतील विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती शाळेमध्ये दरवर्षी आषाढी एकादशी दिंडीचे आयोजन करण्यात येते. त्याला विद्यार्थी पालक व परिसरातील नागरीक या उपक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात असे शाळेचे मुख्याध्यापक जयंत मोरे यांनी सांगितले. या दिंडीचे पूजन शाळेचे शिक्षिका ज्योती टोरपे यांनी केले. शाळेचे शिक्षक सुकलाल महाजन व महेंद्र विधाते यांनी दिंडीची सजावट केली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य पालक व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.शाळेच्या या उपक्रमाबद्दल सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
