
कोपरगाव प्रतिनिधी:-
शिर्डी प्रतिनिधी –कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्यासाठी दरवर्षी हजारो भाविक सहभागी होत असतात. या पारायण सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना आवश्यक असणाऱ्या अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार. व श्री साईसच्चरीत पारायण सोहळ्याची व्याप्ती वाढवून हा पारायण सोहळा यापुढील काळात भव्य दिव्य करणार असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने व नाट्य रसिक मंच शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्री साईसच्चरीत पारायण सोहळ्यास अध्यक्ष आशुतोष काळे यांनी भेट देवून नियोजनाबाबत माहिती जाणून घेतली यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, मागील दोन वर्ष कोरोना महामारी असल्यामुळे मोठ्या स्वरूपात पारायण सोहळा होऊ शकला नाही मात्र साईबाबांच्या कृपेने मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे साईबाबा संस्थानच्या वतीने सर्व उत्सव व सोहळा पूर्वीप्रमाणे पार पडत आहेत साजरे केले जात आहेत. यासाठी भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पारायण सोहळा हा देखील साई भक्तांसाठी एक मोठा उत्सव असून दरवर्षी या पारायण यासाठी हजारो पारायणार्थी सहभागी होत असतात. यावर्षी देखील या पारायण सोहळ्यासाठी ३ हजार ५०० महिला व २ हजार पुरुष अशा मोठ्या प्रमाणात ५५०० पारायणार्थींनी सहभाग घेतला आहे. ही संख्या भविष्यात वाढतच जाणार आहे त्या दृष्टीने पारायणार्थींना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा योग्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढील काळात साईबाबा संस्थानच्या माध्यमातून पारायण सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पारायणार्थिंना सोयी सुविधा देण्यावर भर दिला जाईल अशी ग्वाही विश्वस्त मंडळाच्या वतीने अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त महेंद्र शेळके, अविनाश दंडवते, सुहास आहेर, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेबजी कोते, श्री जोरी, श्री उगले, डॉ. किसवे आदींसह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
