
अतिवृष्टीची नुकसानभरपाई सर्वच शेतकऱ्यांना द्या …
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील वर्षीच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शासनाकडून नुकतीच ३१ मार्च पर्यंत अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणे बाबत जाहीर केले असले तरी ही नुकसान भरपाई कोपरगाव मतदार संघातील फक्त १८३२३ शेतकऱ्यांनाच मिळणार असल्याची माहिती मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबत खुलासा करण्यात आलेला नसून अद्याप एकही शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे पात्र शेतकरी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची आतुरतेने वाट पाहत असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री ना.एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघात माहे सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने एकत्रित पंचनामे करून कृषी विभागाच्या अहवालानुसार एकूण ४५५२३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले बाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभुमीवर शासनाकडून ३१ मार्च पर्यंत अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणेबाबत जाहीर करण्यात आले आहे.
यामध्ये माहे सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या अहवालानुसार एकूण ४५५२३ शेतकऱ्यांचे नुकसानी बाबतचा अहवाल शासनाकडे दाखल केलेला असतांना त्यापैकी फक्त १८३२३ शेतकऱ्यांनाच अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या यादीमध्ये समाविष्ट केले असल्याची माहिती मिळाली असून उर्वरित २७२०० शेतकन्यांना अतिवृष्टीच्या झालेल्या नुकसान भरपाईचे यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे ८१.३२ कोटीच्या मागणीपैकी फक्त २७.०० कोटीची नुकसान भरपाई अनुदान मिळणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे ५४.०० कोटीचे अनुदान कधी मिळणार याबाबत शासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मिळणे गरजेचे असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री ना.एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
