विकासकामांच्या निविदा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर कराव्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना,कॉंग्रेस, मनसे तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या विकासकामांच्या निविदा कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर नामंजूर केल्या आहे. या नामंजूर करण्यात आलेल्या विकासकामांचे ठराव जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात कलम (३०८) अन्वये मंजूर करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्या आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे विकास कामांचे ठराव तातडीने मंजूर करावे अशी मागणी कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांसह कॉंग्रेस, मनसे तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेवून त्यांच्याकडे केली.
कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी बहुमताच्या आधारे विकासकामांच्या निविदा नामंजूर केल्या होत्या. या नामंजूर करण्यात आलेल्या निविदा जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष अधिकारात नगरपालिका कलम (३०८) अन्वये मंजूर करून घेवून शहरवासियांचे विकासाचे प्रश्न सोडवावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्याकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने गुरुवार (दि.४) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेचे नगरसेवक,सर्वपक्षीय पदाधिकारी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, आरोग्य आदी विभागांच्या विकास कामांच्या निविदा मंजुर करण्याबाबतचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये कोपरगाव शहरातील नागरीकांच्या दृष्टीने मुख्य बाजारपेठ, तसेच तहसील कार्यालय, पंचायत समिती या व्यतिरिक्त विविध शासकीय कार्यालयाकडे जाणारे रस्ते व कोपरगाव शहरातील पाच प्रभागांना जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश होता. या रस्त्यांचा शहरातील हजारो नागरिकांना तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे. नागरिकांचे आरोग्यहित लक्षात घेवून पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या स्वच्छतेचा विषय देखील बहुमताचा चुकीचा वापर करून सत्ताधारी नगरसेवकांनी या निविदा अर्धवट माहितीच्या आधारे नामंजूर केल्यामुळे शहरविकास थांबला आहे. नामंजूर करण्यात आलेली विकासकामे हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. समाजहिताचा विचार करून आपण आपल्या विशेष अधिकारात हि नामंजूर विकासकामे मंजूर करावे असे दिलेल्या निवेदनात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना कोपरगाव शहरवासीयांच्या वतीने राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना,कॉंग्रेस, मनसे आदी पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यावेळी विकासकामांचे ठराव मंजूर करावे याबाबतचे कोपरगाव शहरातील जवळपास नऊ हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिलेल्या निवेदनासोबत देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी महेमुद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, शिवसेना उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल साळुंखे, मनसे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, मनसेचे दिव्यांग जिल्हा कार्याध्यक्ष योगेश गंगवाल, सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंदे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ-नामंजूर विकासकामांचे मंजूर करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना,कॉंग्रेस, मनसे आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *