
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – गोदावरी नदीवरील वारी पुलाचा मागील अनेक वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून वारी पुलासाठी मंजूर झालेल्या २० कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मागील पाच ते सहा दशकापासून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अत्यंत महत्वाचा असलेला वारी येथील गोदावरी नदीवरील पुलाचा प्रश्न प्रलंबित होता. वारी व परिसरातील नागरिकांना सातत्याने येणाऱ्या अडचणीची दखल घेवून हा पूल बांधण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात पाठपुरावा करून या पुलासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. परंतु २०१४ नंतर त्यासाठी आवश्यक पाठपुरावा झाला नाही त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा दुर्लक्षित झाला.
मात्र २०१९ च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर आ. आशुतोष काळे यांनी त्याबाबत नव्याने प्रस्ताव दाखल करून या पुलाचे महत्व शासनदरबारी वेळोवेळी मांडले होते व वारी ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी देखील पोटतिडकीने मांडल्या होत्या व त्याबाबत सातत्याने त्यांचा पाठपुरावा सुरू होता.
त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याची दखल घेवून २०२१ च्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी पुरवणी अर्थसंकल्पात वारी येथील गोदावरी नदीवरील पुलासाठी तब्बल २० कोटी रुपये निधी मंजूर केला होता व आज प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होवून या पुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे.त्यामुळे लवकरच या पुलाच्या कामाचा प्रारंभ होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
