

५० वर्षे सुरू असलेली जनतेची परवड थांबणार..!
नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रहार सदैव तत्पर – आप्पासाहेब ढुस.
कोपरगाव प्रतिनिधी
(देवळाली प्रवरा):-
माजी पाटबंधारे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मंजूर केलेल्या पुलांचे देवळाली प्रवरा मध्ये आज मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रत्यक्ष पुलांच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे येथील जनतेची परवड कायमची थांबणारअसून नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष सदैव तत्पर असल्याचे प्रहार श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा येथील कदम – काकडे.., वरखडे – नालकर.., व सांबारे – वाडकर वस्ती जवळील भंडारदरा धरणाच्या कॅनॉल वर ये जा करणेसाठी आवश्यक असलेल्या पादचारी लोखंडी पुलाचा प्रश्न गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित होता..,
प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांच्या दि. २० जून २०२२ रोजीच्या लेखी मागणी नुसार वरील तीनही लोखंडी पुलांना तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री मा. बच्चूभाऊ कडू यांनी तात्काळ मान्यता दिली. या कामी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे यांनी मंत्रालयात पाठपुरावा केला.
१४ जुलै २०२२ रोजी पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी मंजूर झालेल्या पुलांची आप्पासाहेब ढुस यांचे सह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व तांत्रिक माहितीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला.
या प्रसंगी बोलताना ढुस यांनी म्हंटले की, देवळाली प्रवरा येथील कदम – काकडे.., वरखडे – नालकर.., व सांबारे – वाडकर वस्ती जवळील भंडारदरा धरणाच्या कॅनॉल वर ये जा करणेसाठी येथील नागरिकांची अत्यंत गैरसोय होत होती, पाटाला पाणी आल्यावर येथील शाळकरी मुलांना जवळपास एक ते दोन किलोमीटर वळसा घालून शाळेत जावे लागत होते.., पाटाच्या दुतर्फा राहणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांचा चारा पाटातून वाहतूक करणेसाठी मोठी सर्कस करावी लागे.., आणि जर पाटाला पाणी असेल तर खूप लांबून चारा वाहतूक करावी लागत असे.., दूध उत्पादक शेतकरी यांना दूध वाहतूक आणि वयोवृध्द नागरिकांची पाट ओलांडताना होणारी गैरसोय पाहता वरील तीनही वस्तीवरील नागरिकांच्या लेखी मागणीवरून आम्ही दि. २० जून २०२२ रोजी प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे मार्फत पाटबंधारे राज्यमंत्री मा. ना. बच्चूभाऊ कडू यांना निवेदन देऊन येथे तात्काळ लोखंडी पादचारी पूल करून मिळणेची मागणी केली होती.
नामदार बच्चूभाऊ कडू यांचे आदेशाने उपरोक्त ठिकाणी तात्काळ लोखंडी पादचारी पूल बसवून देणेकामी कार्यवाही सुरू झाली असून आज मान्यवरांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
आठ ते दहा दिवसांत एक या प्रमाणे तिन्ही पुलाचे काम पंधरा ते वीस दिवसात बांधून पूर्ण होणार असून त्यामुळे येथील शेतकरी, वयोवृद्ध नागरिक व शाळेत जाणारे विद्यार्थी यांची होणारी गैरसोय त्यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रहार सदैव तत्पर असल्याचे सांगून या तीन पुलांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याबद्दल पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी यांचेसह प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे व नामदार बच्चूभाऊ कडू यांचे आप्पासाहेब ढुस यांनी आभार व्यक्त केले.
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ कामगार सेल चे प्रमुख बाळासाहेब कराळे, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे सचिव प्रशांत कराळे, प्रहार चे राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, संघटक प्रभाकर कांबळे, शाखा अध्यक्ष अमोल अंबिलवादे, प्रसादनगर शाखा उपाध्यक्ष सनी सोनवणे आदींसह सांबारे वस्तीवरील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
