
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगावात शाळा,कॉलेज मध्ये ये-जा करण्यायासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी बसनी येतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना एस.टी महामंडळाकडून सवलतीचा पास काढावा लागतो. परंतु हा पास मिळवण्यासाठी तालुक्यातील अनेक विद्यार्थी त्यांचे कॉलेज बुडवून गेल्या ३ दिवसांपासून रांगेत उभे असून देखील त्यांना पास मिळत नाही. कोपरगाव बसस्थानक आगार प्रशासन विध्यार्थ्यांच्या होणा-या या गैरसोयी कडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना या पासचे दरमहा नूतीनकरण करावे लागते. त्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी डेपोत फेऱ्या माराव्या लागतात. काही ठिकाणच्या विद्यार्थ्यांना केवळ पासच्या नूतनीकरणासाठी डेपोत यावे लागते. त्यासाठी रांग लागलेली असते. पास लवकर निघाला नाही, तर बस सुटण्याची भीती असते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना रांगेतूनच माघे फिरण्याची वेळ येत आहे. या त्रासाला कंटाळून काल अखेर विद्यार्थ्यांनी ही गंभीर बाब शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांची भेट घेऊन त्यांना सांगितली व या संदर्भात लक्ष देण्यास विनंती केली असता त्यांनी तातडीने आगार व्यवस्थापक चौधरी यांना फोन द्वारे संपर्क केला व विद्यार्थ्यांना पास काढण्यास होत असलेला त्रास लक्षात आणून दिला. तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य विशाल झावरे यांना प्रत्येक्षात बस स्थानकात जाऊन विद्यार्थ्यांची अडचण आगार प्रशासनाला भेटून सोडविण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेनुसार विशाल झावरे यांनी वाहतूक विभागाचे अविनाश गायकवाड यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना पास देण्यास का विलंब होत आहे याची माहिती घेतली व तातडीने या विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यास सांगितले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत उद्या पर्यंत विद्यार्थ्यांना पास मिळेल असे त्यांनी आश्वासित केले. तसेच कोपरगाव एसटी महामंडळ प्रशासनाने सवलतीच्या पासच्या कामाचा भार जास्त असल्याने कर्मचाऱ्यांना दोन शिफ्ट मध्ये ड्युटी लावावे जेणेकरून जास्त वेळ कामकाज चालेल व विद्यार्थ्यांना पास मिळविण्यासाठी जास्त वेळ रांगेत उभे राहण्याची वेळ येणार नाही असे मत राजेंद्र झावरे यांनी व्यक्त करत लवकरच या बाबत शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचे सांगितले.
