
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी):-
प्रहार च्या आंदोलनाने राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील नागरिकांना हक्काचे पाणी मिळाले असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी केले.
प्रसादनगर भागात शिंगी प्लॉट हद्दीतील ५० कुटुंबांना नळ जोडणी दिली असून शेवटच्या अंतिम टप्प्यातील जवळपास १५ कुटुंबांना नळ जोड देणेचे काम देवळाली प्रवरा नगरपालिकेने हाती घेतले आहे, त्या कामाची सुरुवात व पाहणी करताना आप्पासाहेब ढुस बोलत होते.
या प्रसंगी प्रहारचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय कुमावत, राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, उपाध्यक्ष गणेश भालके, प्रहारच्या राहुरी फॅक्टरी महिला शहर अध्यक्ष राजनीताई कांबळे, उपाध्यक्ष अफसाना शेख, वंदना कांबळे, सय्यद, संघटक प्रभाकर कांबळे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
प्रसंगी पुढे बोलताना ढुस म्हणाले की, प्रसादनगर भागातील नागरिकांनी प्रहार संघटनेवर दाखविलेला विस्वास व एकजुटीचा हा विजय असून, येथील नागरिकांनी जागतिक महिला दिनी प्रहार चे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांचे सहकार्याने येथील प्रहार सैनिकांच्या नेतृत्वाखाली देवळाली प्रवरा नगरपालिकेवर आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पिण्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी हंडा मोर्चा काढल्यामुळे येथील नागरिकांना त्यांचे हक्काचे पाणी मिळू शकले व प्रसादनगरच्या नागरिकांचा तब्बल चाळीस वर्षांचा पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ हटण्यास त्यामुळे मदत झाली आहे.
प्रसादनगर भागातील नागरिकांनी दाखविलेली एकजूटी बद्दल त्यांचे, तसेच सर्व प्रहार सैनिकांचे आणि देवळाली प्रवरा नगरपालिकेने पाणी देणेचा शब्द पूर्ण केला त्याबद्दल त्यांचेही आप्पासाहेब ढुस यांनी या प्रसंगी बोलताना आभार व्यक्त केले.
