
कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव शहर व तालुक्यातील अनेक प्रश्न-समस्या सोडविण्यासाठी आजी व माजी
आमदारांनी एकत्र बसून चर्चा-विचारविनिमय करणे सर्वांच्याच हितासाठी अंत्यत गरजेचे आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यातील पिण्याचे पाणी व सिंचनाच्या समस्या, बेरोजगारी कमी करण्यासाठी MIDC, विस्थापितांचा प्रलंबित प्रश्न, अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक राजकिय इच्छाशक्ती व एकजूट असेल तर होऊ शकते. प्रत्येकवेळी, प्रत्येक विषयांत श्रेय कुणाचे यावरूनच फक्त वातावरण दूषित होते. काही अनुयायीसुद्धा स्वार्थापोटी नेत्यांत अंतर वाढविण्याचेच काम करत असतात. असा अनुभव मीही घेतलेला आहे. पण अशा प्रवृतींमुळे शहर व तालुक्यातील जनतेचीच हानी होत आहे. 4 वर्षांपूर्वी मी MIDC व्हावी यासाठी सह्यांची मोहीम राबविली, उद्योग मंत्री ना. सुभाषजी देसाई व वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही भेटलो. त्यावेळी अधिकाऱ्यांनी MIDC साठी 700 एकर जमीन उपलब्ध व्हावी असे सांगितले. खरे तर आजी माजी आमदार, खासदार व सर्वपक्षीय नेत्यांनी एकजुटीने प्रयत्न केले तरच हे शक्य आहे.
श्रेय वगैरे असे काहीच नसते. निवडणुकीत जनता-मतदार निर्णय देतात तो मान्य करून पुढील वाटचाल करणे आवश्यक आहे. मी ना. श्री.आशुतोषजी काळे व माजी आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांना आवाहन करतो कि याबाबत सकारात्मक विचार करून एकत्र बैठक घेण्याचा निर्णय घ्यावा. राजकारणात आरोप प्रत्यारोप होतच असतात, पण व्यापक हितासाठी मागे पुढे व्हावे लागते. दोघांनीही मध्यस्थांच्या माध्यमातून अशा एकत्रित बैठकीचा निर्णय घ्यावा. किमान प्राथमिक चर्चा झाली तरी अनेक बदल घडू शकतात यात शंका नाही असे वाटते. 5 नंबर साठवण तलाव, नियोजित निळवंडे पाणी योजना, MIDC, विस्थापितांना जागा इ.अनेक विषय राजकिय एकजुटीने वेगाने तडीस जाऊ शकतील यात शंकाच नाही. राजकिय स्पर्धाच होत राहिली तर विकासकामे अडचणीत येतात हे सर्वजण जाणतात.
