
८३५ किमीचे ४३६ रस्ते नकाशावर आणण्यासाठी प्रयत्नशील :- आमदार आशुतोष काळे
१ कोटी ६० लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- माजी आमदार अशोकराव काळे दहा वर्ष विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील अडथळ्यांची शर्यत पार करून त्यांनी कोपरगाव विधान मतदार संघाचा भरीव विकास करून दाखविला. मात्र जे नेहमीच सत्तेत राहिले त्यांनी आमदार अशोकराव काळे यांना त्रास देवून विकासकामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी विकास कामे करायची त्याठिकाणी सत्तेचा उपयोग करून आडवे येण्यात धन्यता मानली.त्यांना सत्ताधारी असून देखील मिळालेल्या संधीचे सोनं करता आले नाही. मात्र मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने मला फक्त आमदारच नाही तर सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याची संधी मिळाली असून मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणून सत्ताधारी आमदार होण्याच्या मिळालेल्या संधीचे सोने करू असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
मुख्य लेखाशीर्ष २५१५ ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर ७५ लक्ष निधीतून कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन तसेच सांगवीभुसार येथे ७५ लक्ष निधीतून रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन व धामोरी येथे १० लक्ष निधीतून संत सावता महाराज मंदिरास संरक्षक भिंत बांधणे अशा एकूण १ कोटी ६० लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की, मतदार संघातील रस्त्यांचा अनुशेष खूप मोठा आहे. अनेक रस्ते नकाशावरच नाहीत. हे रस्ते नकाशावर आणण्यासाठी २०२१ पासून सुरु होणाऱ्या योजनेसाठी ८३५ किलोमीटरचे ४३६ रस्ते जिल्हा परिषदेकडेकडून सरकारकडे मंजुरीसाठी पाठविले जाणार आहे. या रस्त्यांना मंजुरी मिळविण्यासाठी सरकारकडे सर्वोतोपरी प्रयत्न करून या रस्त्यांसाठी निधी आणू. रस्ते नकाशावर आणू नका असा अनेकांनी सल्ला दिला. रस्ते नकाशावर आले तर निधी मिळविण्यात अडचणी येतील, रस्ते नकाशावर आणणे म्हणजे स्वत:साठी स्वत::खड्डा खोदण्यासारखे असल्याचे अनेकांनी सांगितले. मात्र रस्ते नकाशावर येवून जर जनतेचे मह्त्वाचे प्रश्न सुटणार असेल तर जनतेच्या हितासाठी अशा खड्ड्यात जाण्यास कधीही माघार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांबरोबरच मागील पाच वर्षात विजेचा देखील गंभीर प्रश्न निर्माण करून ठेवला गेला आहे. मतदार संघातील एकून ५५० वीज रोहीत्रांवर त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त भार असल्यामुळे हे रोहित्र नादुरुस्त होत असून पाणी आहे पण वीज नाही वीज असली तरी पूर्ण क्षमतेने मिळत नाही. अशी परिस्थिती संपूर्ण मतदार संघात आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ओव्हरलोड रोहित्र बदलणेसाठी व कमी दाबाच्या वीज वाहिन्या, पोल स्थलांतरीत करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समितीमधून दीड कोटी रुपये निधी मिळविण्यात यश मिळाले आहे. प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. निवडणुकीत जय-पराजय होत असतो. पराभवाचा अनुभव मी देखील घेतला आहे त्यामुळे झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीतील पराभवाने खचून जाऊ नका. यामध्ये शिकून पुढे चला, या निवडणुकीचा अनुभव घेवून पुढील तयारी करण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा असा मौलिक सल्ला देवून कार्यकर्त्यांना आमदार आशुतोष काळे यांनी प्रोत्साहित करून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक ज्ञानदेव मांजरे, अशोक काळे, माजी संचालक बाळासाहेब कदम, नारायण मांजरे, चंद्रशेखर कुलकर्णी, राजेंद्रबापु जाधव, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, माजी संचालक भगवान माळी, पुंडलिक माळी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, उपअभियंता उत्तम पवार, आर.टी. दिघे, विजयराव जाधव, सुखदेव घायतडकर, सर्जेराव घायतडकर, उत्तम भुसे, प्रकाश दवंगे, अमोल कदम, दत्तात्रय कदम, गणेश घायतडकर, केशव कंक्राळे , शिवाजीराव गायकवाड, रमेश आहेर, नानासाहेब शिंदे, बाळासाहेब कासार, राहुल जगधने, अशोक जाधव, सोपान कासार, साहेबराव जाधव, दिलीप गायकवाड, माणिक शिंदे, डॉ. कृष्णराव जगझाप, विलास माळी, सुभाष आहिरे, भास्कर वाघ, मनोज माळी, पोपट माळी, देवराम माळी, शिवाजी पेखळे आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट :- मागील पाच वर्षात चाऱ्या उकरल्या गेल्या नाही. त्यामुळे आवर्तन काळात अनंत अडचणी येत होत्या. चाऱ्या उकराव्या यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत होती. मात्र पाणी प्रश्नाची जाणीव असणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांनी निवडून येताच चाऱ्या उकरण्याचे काम हाती घेतले त्याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे यावेळी आभार मानले.



फोटो ओळ- कोपरगाव तालुक्यातील रवंदे, सांगवी भुसार व धामोरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन प्रसंगी आमदार आशुतोष काळे व मान्यवर.
