कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाची “औद्योगिक हब” अशी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वच परिस्थिती अनुकूल असून कोपरगावात उद्योग उभारणीसाठी सहकार्य करावे अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी राज्याचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्याकडे केली. त्यावेळी ना. देसाईंनी औद्योगिक हब होण्यासाठी कोपरगावची परिस्थिती अनुकूल असल्याचे मान्य करून कोपरगाव मतदार संघात उद्योग उभारणीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे ग्वाही ना.आशुतोष काळेंना देवून त्याबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथे गोदावरी बायोरिफायनरीजच्या नविन केमिकल प्लॅन्टचे भूमिपूजन व संशोधन प्रयोगशाळेचे उदघाटन शुक्रवार (दि.१५) रोजी राज्याचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते व ना. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना ना. आशुतोष काळे यांनी औद्योगिक हब होण्यासाठी कोपरगावची परिस्थिती कशी अनुकूल आहे याची सविस्तर माहिती उद्योग मंत्र्यांना दिली. त्यावेळी उद्योग मंत्र्यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्याच्या भरभराटीसाठी नेहमी उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन दिले आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा देखील ऱ्हास होणार नाही याची काळजी मुख्यमंत्री प्रामुख्याने घेतात. त्यांच्याच विचारांवर आम्ही मार्गक्रमण करीत असून कोपरगावची परिस्थिती उद्योग व्यवसाय उभारणीसाठी अतिशय अनुकूल आहे. त्यामुळे ना. आशुतोष काळे यांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. औद्योगिक हब होण्यासाठी कोपरगावची परिस्थिती भौगोलिक दृष्ट्या देखील उत्तम असून पाणी देखील उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही मुबईला आल्यावर आपण त्याबाबत लवकरच बैठक घेवू अशी ग्वाही ना. आशुतोष काळेंना उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांनी दिली आहे.
तत्पूर्वी ना. आशुतोष काळे म्हणाले की, संपूर्ण जगात व देशात काळानुरूप औद्योगिक धोरणात आमुलाग्र बदल होत आहेत. त्यानुसार बदलत असलेल्या परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र राज्याला देखील बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या औद्योगिक धोरणात बदल करावा लागणार आहे व आपले औद्योगिक धोरण बदलावे लागणार आहे. राज्याने अवलंबविलेल्या औद्योगिक धोरणाची २०१३ साली संपलेल्या मुदतीला वाढवून दिलेली मुदत देखील ३० सप्टेंबर २०२२ मध्ये संपत आहे. भविष्यात सेवा क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रावर आधारित उद्योग, आय.टी सेवा आदी क्षेत्रात देखील मोठे फेरबदल होणार आहे. त्या संधीचा फायदा घेऊन रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने राज्याच्या मंत्रीमंडळाने तयारी सुरु केली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारचे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरु आहे. कोपरगाव मतदार संघ नासिक-नगर-औरंगाबाद या मोठ्या औद्योगिक शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर असून या तीनही शहराचा मध्यबिंदू कोपरगाव आहे. कोपरगाव तालुक्यात रेल्वे स्टेशन असून कोपरगाव तालुक्यातून बहुचर्चित समृद्धी महामार्ग, एन.एच.७५२ जी आणि एन.एच.१६० हे राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. कोपरगाव तालुक्यालगत जगविख्यात जागतिक पर्यटन क्षेत्र असलेले शिर्डी देवस्थान आहे. जवळच काकडी विमानतळ असून काकडी विमानतळावरून कार्गो सेवा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने १५० कोटी रुपये निधी काकडी विमानतळाच्या विकासासाठी दिला आहे.त्यामुळे एकूण अनुकूल परिस्थितीचा विचार करून कोपरगावची औद्योगिक हब अशी वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी मतदार संघात उद्योग उभारणीसाठी सहकार्य करावे अशी मागणी ना.आशुतोष काळेंनी केली होती. त्या मागणीला उद्योग मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ सहमती दिली आहे. त्यामुळे भविष्यात कोपरगाव विकासाच्या बाबतीत सर्वच आघाड्यांवर कोपरगाव अव्वल राहणार यात शंका नाही.
यावेळी खासदार सदाशिवजी लोखंडे, उद्योजक समीरजी सोमैय्या,.सौ.अमृताबेन सोमैय्या, गोदावरी बायोरिफायनिरीजच्या कार्यकारी संचालक डॉ. संगिता श्रीवास्तव, संचालक श्री सुहासजी गोडगे, नायब तहसीलदार सौ. मनिषा कुलकर्णी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, राजेश परजणे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शिवसेना तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे, शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल, अॅड. विद्यासागर शिंदे, माजी सभापती मच्छिंद्र टेके, सरपंच सतीश कानडे, कान्हेगावचे उपसरपंच बाळासाहेब काजळे, लोकमतचे उपसंपादक रोहित टेके, पत्रकार फकिर टेके, जनार्दन जगताप, रावसाहेब टेके, अशोक काजळे, बद्रीआप्पा जाधव, विशाल गोर्डे, अॅड. चंद्रकांत टेके, अॅड. अमोल टेके, अॅड. विनायक होन, नामदेव जाधव, बाबासाहेब शिंदे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.

फोटो ओळ:- गोदावरी बायोरिफायनरीजच्या नविन केमिकल प्लॅन्टचे भूमिपूजन व संशोधन प्रयोगशाळेचे उदघाटन प्रसंगी बोलतांना उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई समवेत ना.आशुतोष काळे,
खासदार सदाशिवजी लोखंडे, उद्योजक समीरजी सोमैय्या, सौ. अमृताबेन सोमैय्या, गोदावरी बायोरिफायनिरीजच्या कार्यकारी संचालक डॉ. संगिता श्रीवास्तव आदी.
